शनिवार, २६ मे, २०१२

माझी बाग

                                 माझ्या बागेतील फुले (बाल कविता)

                        माझ्या बागेत फुले अनेक
                      सांगते तुम्हाला  नांव एकेक

                       दारात पहा बोगन उभी लवून
                       विसावा देते  सर्वांना खाली वाकून

                      जवळच बहरला झेंडू छान
                       सर्वांच्या स्वागतास झुकवितो मान
             
                        ताटवी ही गुलाबाची फूलली
                        देव्हा-यात पूजेसाठी सजली

                       जुई कशी खिडकीशी लवून
                       सुगंध पसरवीते घरात डोकवून

                       टपोरा मोगरा हरपतो भान
                       केसात माळण्याचा त्याला मान

                       शेजा-यांचा  बहरला पारिजात
                       सडा मात्र माझ्या अंगणात

                       डौलात उभी रातराणी  
                       रात्री म्हणते नीज राणी.

                        वैशाली वर्तक

                                                         
       
  

गुरुवार, १० मे, २०१२

लेख माहेर

                                                                  माहेर      
                                                           
       माहेर शब्द म्हटला की माया ,जिव्हाळा ,प्रेम, ममता ,स्नेह ,ओलावा ,आत्मीयता ,सहृदयता ,विश्वास, हमी वगैरे सर्व भावना कशा उचंबळून येतात .कारण  माहेरातून ह्या सर्व भावनांची नदी ,जणू काही दुथडी भरून वहात असते.काळजाचाच तुकडा तो . तेव्हा ह्या सर्व भावना माहेरातून मिळणारच . जेथे प्रेमाने , लाडाने गोंजारून हट्ट पुरविलेले असतात .व लहानाचे मोठे केलेले असते . मोठेपणाकडे आणलेली ती पाऊलवाट असते . अशा या माहेराच्या खुणा, आठवणी  आजीवन मनात जिवंत असतात .दिवस रात्र एक करून , डोळ्यात तेल घालून काळजीपूर्वक प्रेमाने वाढविणारी ,जिवापार प्रेम करणारी ,तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारी , योग्य तिथे धाक शिस्तता पाळण्यास लावणारी माणसे असतात.मातीच्या गोळ्याला कुंभार जसे आकार देऊन सुंदर मडकी बनवितो,शिल्पकार आकारहीन दगडातून सुंदर शिल्प तयार करतो .तसे ह्या मानवी निरागस, निर्मल मनावर उत्तम संस्कार, प्रेम,विनयता,,दया,सहनशीलता, हुशारी, चालाखी वगैरे गुणांची जडण घडण करणारे शिल्पकार म्हणजे आई वडील व वडील मंडळी प्रत्येक स्त्रीच्या माहेरात असतात . त्या माहेरतून मिळविलेल्या गुणांचा व घडविणा-या जनांचा अथवा व्यक्तिंचा प्रत्येक  स्त्रिला आदर अभिमान , गौरव तिच्या मनात सतत असतो. म्हणूनच तर माहेर शब्द निघताच स्त्रीचे कान टवकारतात. माहेरची कोणी  व्यक्ति आली की मन माहेरच्या गोष्टी ऐकण्यास  आतुरते .
      कन्या मोठी होते व पतिगृही सासरी येते. माहेर व सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते . सासरी येऊन
सासरच्या मंडळीना आपलेसे करते ,सासरच्या मंडळीत रमते .तेथील रिती , रिवाज ,पध्दती अंगिकारते .व तसे करतांना  माहेरच्या काही  रीतींना तिला मुरड पण  घालावी लागते .तसे करत करत ती पतीगृही रममाण होते .व आपल्या लेकी साठी "माहेर"चे झाड रुजवते .लावते. ही आपल्या संस्कृतीत चालत आलेली परंपरा आपल्या समाज रचनेत च रूढ  झालेली आहे .
     तेव्हा प्रत्येक स्त्रिला माहेर प्रियच असते .व ते असणारच हे स्वाभाविकच आहे . स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी तिचे माहेरच्या आठवणीने मन गहिवरते .त्या आठवणीत मन रमते.नुसत्या आठवणीने मन सुखावते.आनंदते. म्हणूनच तर कवी देखील  स्त्रीच्या मनातील माहेरा बद्दलचे विचार  , कवी कल्पनेतून रंगवितात. जसे की,"वा-या कडून तू माहेरास जा व मी येथे सुखात  आहे असा  संदेश पवनास देण्यास व माहेरची खुशाली घेऊन येण्यास व तेथील जुई  अजून तशीच बहरत आहे ना? त्या जुईचा सुगंध पवना तू माझ्या पर्यंत आण. दमून भागून आलेल्या आई बाबांना माझी खुशाली दे.व झोपाळ्यावर बसलेल्या आजीच्या कुशीत जाऊन माझा खुशालीचा  निरोप दे "अशा विचाराने स्त्रीचे मन तिच्या माहेरात कसे  भरकटत असते ते कवींनी पण साहित्यात रंगविले आहे.पुढे काळाच्या गतिप्रमाणे माहेरचे छ्त्र जरी हरपले तरी मन मात्र मागे वळून माहेरच्या आठवणीत जगते .
    तेव्हा जेथे ओलावा प्रेम ते माहेर . अशी सर्व सामान्य स्त्रीची माहेरची कल्पना असते .पण माहेर फक्त  स्त्रीयांनाच  असते असे नव्हे .तर जिथे जीवाला आनंद ,सुख ,समाधान मिळते ,जेथे विश्वास श्रद्धा आशा असते व ज्या ठिकाणी आपण आपले मन मोकळे करू शकतो असे ठिकाण ते माहेर . त्यामुळेच तर भक्तिमार्गात माहेर या शब्दास खूप महत्व आहे. संत लोकांना देव हेच मायबाप वाटतात . अर्थात ,प्रत्येकासाठी ते खरेच आहे .कारण तोच तारक,तोच विश्वंभर . विश्वाचा भार वाहून नेणारा आहे.त्यामुळे संत लोकांनी तर भक्तिरसात विठोबास  तुच माझी माता पिता, तसेच देवाजीच्या दारी, देवाच्या पायी ,विठोबाच्या व्दारी  माझे माहेर आहे . व तेथेच त्यांना परमआनंद  प्राप्त झाला .म्हणूनच संतानी भक्तीत विठोबाला लेकुरवाळा पण संबोधले आहे. संत मंडळी त्याची लेकरे आहेत . जसे की गोराकुंभार मांडीवर आहे ,चोखामेळा बरोबर आहे जनाबाई मागे उभी आहे .असे विठोबाचे चित्र भक्तिरसात  वर्णिले आहे.कारण ही सर्व मंडळी विठोबाच्या  नामस्मरणात, त्यांच्याशी एकरूप होण्यात, माहेरचा विसावा मिळाल्याचा आनंद मानतात .म्हणूनच तर जनार्दन स्वामी म्हणतात ,"माझे माहेर पंढरी ,आहे भिवरेच्या तीरी " तेव्हा भक्तिरसात माहेरची अशी कल्पना आहे .
    आता काळ बदलला आहे मुली शिक्षीत झाल्या आहेत नुसत्याच शिक्षीत नव्हे तर शिक्षणाच्या जोरावर आर्थिक दृष्ट्या पण सबळ झाल्या आहेत.त्यामुळे त्यांना स्वत:ला   वैचारिक  स्वातंत्र्य  तसेच आर्थिक स्वातंत्र्य  प्राप्त   झाले आहे  आणि विज्ञानाने जग अगदी जवळ आले आहे त्यामुळे माहेर पण जवळ झाली आहेत. आता कवी कल्पनेतून वा-याकडून  माहेरास संदेश पाठविण्यात मन रमविण्याची गरज भासत नाही  तर सरळ फोन  उचलून तसेच वेब कॅमेरा व्दारे क्षणात माहेरचा आवाजच नाही तर सचित्र माहेरात जाऊन पोहचता येत आहे.
     तसेच नौकरी निमित्य वेगळ्या गावात सासर थाटावे लागल्याने अथवा स्वतंत्र कुटुंबात रहात असल्याने  म्हणजे एकत्र कुटुंब नसल्याने मुलींना स्वतंत्र कुटुंबात घराची जवाबदारी एकटीलाच
उचलावी लागते व त्याच  बरोबर व्यक्ति स्वातंत्र्य मिळत असल्याने जवाबदारी व स्वतंत्रता यात गुंतल्याने  माहेरची ओढ जरी भासत  असली , माहेर जरी सदा प्रियच असले तरी  पण जवाबदारी  तिला मोठी बनविते .तसेच   मुलींचे  आई वडिल  मुलीचे भवितव्य लग्ना आधी घडविण्यात जागरूक असतातच पण आता  सुनेचे  भवितव्य  सांभाळण्यात सासरची मंडळी पण तितकीच जागरूक झालेली आहेत . तेवढेच नव्हे तर मुलीची आई पण मुलीच्या घरी म्हणजे मुलीच्या सासरी जाऊन माहेरची बरसात करून भवितव्य सांभाळण्यात  मदतरूप होत आहेत .त्यामुळे ख-या अर्थाने माहेर सासर एक झालेले आहे . त्यामुळे
           
       कृष्णा मिळाली कोयनेला
      तसाच माझा माहेर बाई                                   
     येऊन मिळाल सासरला  
  या गाण्याच्या ओळी ख-या  अर्थाने प्रत्यक्षात   उतरत  आहेत  .व माहेर   सासर असा भेद राहिला नाही.हे सारे
वैचारिक प्रल्गभतेने होत आहे .व चांगलेच आहे.

                  






        
                                    

nivant( KAVITA)\ निवांत क्षण\ सकाव्य. निवांत

                                                                        निवांत 
                  सुख, शांति  अन् आनंद ,
                  मिळविण्या धावे  मानव जन्मभर .
                  परि असती हे तयाच्याच मनांत ,   
                  तशीच असे तृष्णा निवांत .
                                           जीवन चाले भरघाव गतिने, 
                                           निवांत क्षण तयाते न  मिळे .                              
                                           तगमग होतसे जीवास फार ,
                                           परि शोघिती जीवनात  निवांत.
                                                       मानसिक एक तृष्णा निवांत 
                  निवांत शोधिती पशू अन् विहंग 
                  मजेत टिपती वा  विहरती नभातून                 
                  रवंथ करिती गुरे  निवांतात 
                  कसा मिळतो तयांना निवांत                                             
                                                      मानसिक एक तृष्णा निवांत .
                                           शमवून अपुल्या तप्त किरणांना ,
                                           रवि जातसे अस्त चलाला.
                                           जणू अवनीच्या कुशीत लपून ,
                                          शोधितो तो पण निवांत  .
                                                       मानसिक एक तृष्णा निवांत .
               धिक्कार असो असल्या जिण्याचा ,            
              असे, चिंता भवतापच नुसता .
               न मिळती क्षण  निवांताचे  ,                                      
               ते कसले  जीणे निरर्थकाचे  ?                               
                                                      मानसिक एक तृष्णा निवांत .
                                            मिळवावा लागतो  क्षण निवांत ,
                                            बदल पहाया सृष्टीचे नित नव .
                                            मेघांचे बदलते रंग नभाते,
                                            मग सुचते गीत निवान्ताचे .
                                                      मानसिक एक तृष्णा निवांत.           












DBAसाहित्यिक गडचिरोली
आयोजित उपक्रम
विषय .. क्षण एकांताचे

  शीर्षक...मानसिक  तृष्णा निवांत.     


सुख, शांति  अन् आनंद ,
 मिळविण्या धावे  मानव
  परि असती ते तयाच्या मनांत ,   
    तशीच असे तृष्णा निवांत .

    जीवन चाले भरघाव गतिने, 
    क्षण तया'ते न  मिळे  निवांत                            
     तगमग होतसे जीवास फार ,
     परि शोघिती जीवनात  एकांत
                                                       
     निवांत शोधिती पशू अन् विहंग 
   मजेत टिपती वा  विहरती  नभात        
    रवंथ करिती गुरे  निवांतात 
     कसा मिळतो तयांना निवांत                                             
                                                     
   शमवून अपुल्या तप्त किरणांना 
   रवि जातसे अस्त चलाला
  जणू अवनीच्या कुशीत लपून 
  शोधितो तो पण निवांताला  .

  धिक्कार असो असल्या जिण्याचा ,     
न मिळती क्षण  निवांताचे  ,     
असे, चिंता भवतापच नुसता 
ते कसले  जीणे निरर्थकाचे  ?        

  मिळवावा लागतो  क्षण निवांत ,
 बदल पहाया सृष्टीचे नव नीत
थज मेघांचे बदलते रंग नभाते,
मग सुचते  निवान्ताचे गीत
                                                           
वैशाली वर्तक
अहमदाबाद



साकव्य काव्य स्पर्धा 26
स्पर्धेसाठी
विषय ... निवांत 

शांत शांत अगदी निशांत
क्षण फिरुनी यावे निवांत

 सुख, शांति  अन् आनंद ,
  मिळविण्याचा असे छंद
  सारे वसती  आपुल्याच  मनात
  क्षण फिरुनी यावे निवांत.            1

मन शोधी सदैव शांती                
जीवाला न कदापि भ्रांती 
वाटे मनाला हवा एकांत
क्षण फिरुनी यावे निवांत                 2                                 
 मजेत  विहरती पहा विहंग
 गुरे  निवांतात  करीती रवंथ
कसा मिळतो क्षण तया शांत
 क्षण फिरुनी यावे निवांत.                3
                                                  .      
तप्त किरणांना  शमवून
जातो धरेच्या कुशीत लपून
येतो गगनी शशीकांत
क्षण फिरुनी यावे निवांत.                 4

वैशाली वर्तक
अहमदाबाद.  १\८\२३



शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

लेख. पण सांगायचे राहून गेले

                       पण सांगायचे राहून गेले                                            
  निर्मला खूप बोलकी अगदी अवखळ वहात्या झ-या सारखी बोलणारी .एकदा बोलू लागली की
तिला काय सांगू  किती बोलू असे व्हायचे .अशी बोलक्या स्वभावाची वा  बडबडी .तिच्या समोरच्या व्यक्तीला नेहमी श्रोताच व्हावे लागते .     
          सहज एकदा, एकदा  कसले? तिचे असे  अनेकदा  होते  .मैत्रिणीला वाढदिवसा  निमित्य शुभेच्छा देण्यास फोन केला .फोन उचलला.झाsss ले ! "काय ग काय म्हणतेस?बरेच दिवसात फोन नाही .नुसती म्हणतेस  की तुझी आठवण येते. पण कधी फोन करत नाहीस, का कधी येत नाहीस, कोठे भेटू म्हंटले तरी  नाही असे उत्तर असते ," असे म्हणत तिने जे  भाष्य  (बोलणे) सुरु केले की , तिच्या सर्व मैत्रिणी, त्यांच्या सासू , त्यांच्या  नातवंडांच्या. इव्हन शेजार पाजा-यांच्याबद्दल गप्पा झाल्या पण फोन ज्या कारणाने होता त्या  बद्दल विषयच नाही .आणि मग गप्पा मारून  फोन ठेवला   थोड्या वेळानंतर लक्षात आले की,अग बाई ! मी तिला फोन वाढ दिवसा निमित्य शुभेच्छा देण्यास केला होता . आणि ते तर मला सांगावयाचे राहूनच गेले ! मग काय पुन्हा पुन्हा  फोन लावला पण मग मात्र तिचा फोन सतत एंगेज येत होता. कारण  तिच्या सारखे तिच्या मैत्रिणीचे बरेच well wishers  होते ना.  
         कित्येकदा असे होते, सांगायचे असते ते राहूनच जाते. हो, ती 'झी मराठी" वरची   " कुंकुं" सिरीअल होती  तिच्यात  नाही का ? जानकीला तिच्या नव-यास   खूप काही सांगायचं असते , सांगणे सुरुवात करे पर्यंत वेळ जातो .तिच्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला पैशांची गरज आहे. हे ती नव-यास कधी ची सांगण्याचा
प्रयन्त करावयाची ,पण दर वेळी काही कारणाने सांगावयाचे राहून जावयाचे असो, हो ! पण त्यामुळेच तर सिरीअल  लांबते ना ?.व आपणास मनोरंजन मिळते .तेव्हा  अशा व्यक्ति समाजात असतात की मूळ मुद्यावर  येता येत नाही .मग मनात हूर हूर करत बसतात 
       तशीच एक वेडी प्रेयसी . प्रेमात वेडी झालेली म्हणून वेडी बर का ! . प्रियकराला रोज भेटत होती .मला तू आवडतोस म्हणून सांगावयाचे रोज नक्की करावयाची , पण रोजच सांगावयाचे राहून जायचे. घरी येऊन  मनाशी म्हणायची , इश्य  बाई ! आज पण नाही जमले. सांगायचे राहूनच गेले .प्रियकर गावीं जाण्यास निघाला  ती स्टेशनवर सोडावयास गेली .तेथे  आता तरी पटकन बोलावे ना ! पण छे ,शेवटीं गाडीची सुटण्याची वेळ झाली सिग्नल  मिळाला ,गाडी हलणार शेवटी हातवारे करून  डम शो मध्ये करतात ना  तसे करून  I love you दाखविले . ठीक झाले .प्रियकरास भावना तरी  पोहचल्या .तो म्हणाला हा! हा! भा. पो  म्हणून ठीक झाले.   तेव्हा पण  तोंडाने सांगावयाचे राहूनच गेले !   
      आपण मंदिरात जातो. तेथे पण  असेच होते .देवाजवळ  काय काय मागावयाचे ते नक्की करतो. हो! देवच तर हक्काचा आहेना ! ज्याच्या जवळ सर्व मागण्या आपण मागू शकतो. व कुणास पण न  ऐकू येवू देता  मनातील इच्छा प्रगट करू शकतो .पण भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून देवाजवळ मागावयास जावे तेवढ्यात " ए चला पुढे व्हा ,गर्दी करू नका म्हणून पुजारी ओरडतो. व देवा जवळ पण सांगावयाचे राहूनच जाते .
     असो माझ्या सारख्या  बाकीच्या मंडळींना  सांगते, तुम्हास  पण काही सांगावयाचे असेल ते सांगून द्या.  पटपट लिखाण करा .नाही तर  मग मनात हूर हूर राहील की   पण........ सांगावयाचे( लिहावयाचे ) राहूनच गेले

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१२

दिवाळी वर्तकांची

                                                             दिवाळी
     यंदाची दिवाळी धाकट्या अजित कडे पुण्यास होती. पण यंदाची दिवाळी जणू काही मोठया  मंडळीची    अथवा सिनिअर सिटीझनच होती .एक नात सोडली तर कोणीच नातवंडे आली नव्हती. विमला बाईंच्या सुना, मुले, जावई व मुलगी एवढीच मंडळी एकत्र  होणार होती.आपल्या दिवंगत नव-याच्या फोटोकडे पहात विमलाबाई विचार करत होत्या.मधेच मनांत  हसत होत्या. त्यांना  फोटोतून आवाज आल्याचा भास  झाला,"काय ग विमल यंदाची, आपल्या कुटुंबाची दिवाळी रोडावल्या सारखी वाटतेय ? " हो ना ! " नातवंडे म्हणजे आपली चिमणे पाखरे पंख  विस्तारून दूर गेली आहेत आणि आयुष्यात उंच उंच भरा-या घेतल्याच पाहिजेत ना! आता नातवंडे साता समुद्रापार त्यांचे  उज्वल भवितव्य  घडविण्यात व नाती त्यांच्या त्यांच्या सासरी व नात  सुना आपल्या नातवंडा बरोबर दूर परदेशात आहेत  .आपला काळ वेगळा होता .मुले भारतातच होती. येऊन जाऊन थोरला फक्त दूर असायचा दूर म्हणजे सूरतला".आणि   एखाद वर्षी अनिल पण बेहरीनला असल्याने दिवाळीत नव्हता. नाही का हो?" पण बाकी सर्व वर्षी मुले एकत्र होती व असायचीच .दिवाळी म्हटली की एखाद मंगलकार्य असावे असे सर्व जण एकत्र यावयाचे  . पुढे त्यांची कुटुंबे पण  वाढत गेलीत तरी सर्व नातवंडे ठरल्या प्रमाणे उत्साहाने एकमेकांना भेटणार या ओढीने, आठवणीने यावयाची .एकत्र जमायची, खेळायची . पुढे पुढे फिरती दिवाळी म्हणजे प्रत्येकाकडे जावयाचे अशी दिवाळी सुरु झाली .त्यामुळे प्रत्येकाकडे  जाण्यात वेगळी मजा असायची .आठवते ना ? एकदा आपला  पुतण्या पण सहकुटुब दिवाळीस आपल्या दिवाळीत सह भागी झाला होता.
 
          दिवाळीत   एक सून, मुलांना म्हणजे आपल्या नातवंडांना पकडून अंघोळी घालण्यात, तर एक स्वयंपाकात, तर एक सून   फराळाचे  पहाण्यात  गर्क असावयाची आणि  आठविते  कां ते चित्र?
आपली ताई हॉलमध्ये एक पाय पसरून व तिच्या आजू बाजूला सर्वांनी आणलेले फराळाचे डबे ठेवून बसलेली  आणि तोंडाने," अरे ,मुलांना काचेच्या डिश नको त्या कागदी डिश दे अथवा त्या  मासिकाचे कागद फाड.अजित तू  काढून ठेवली आहेत ना ?"असे म्हणत असायची.आणि त्यात मुलांचा गलका "ए मला रवा लाडू दे ,तर दुसरा ए, मला रवा लाडू नको, मला बेसन लाडू दे ,मला चकली नाही दिली, मला दोन चकल्या दे .आणि दाल मुठ पण हवीय मला ".असा गलका, गोंधळ चालू असायचा .हो!साधनाच्या दाल मुठ शिवाय दिवाळीला  पूर्णता  नाही . त्यात मधेच ताईचे  सांगणे असावयाचे की अग साधना त्याबाजूला अर्धा अर्धा कप चहा टाक, तुमच्या गुजराथी पद्धतीचा दुध पाणी मिक्स . आणि मुलांनो, तुम्ही आधी खाऊन घ्या ,मग या  बाजूला या मी पाणी देते "अशी तिची बडबड तोंडाने चालू असायची,त्यात कोणाचा तरी उठताना भरलेल्या पाण्याच्या ग्लासला पाय लागावयाचा की अरे फडके आणा तिथून असा गलका सुरु  व्हायचा . घर कसे भरलेले असावयाचे.
     पाडव्याला मुले आपापल्या बायकांना काही तरी गिफ्ट वस्तू ,दागिना आणावयाचे.मग कोणाचा पाडवा किती भारी यावर चर्चा चेष्टा,विनोद गप्पा व्हायचा .तुमच्या पासून ओवाळ्णीस सुरुवात व्हायची.तुम्ही नेहमी प्रमाणे हातातील अंगठी काढून ताम्हनात टाकावयाचे .आणि हो लक्ष्मी पूजनाला तुम्ही सांगावयाचे तितकी नीट पूजा कदाचित सांगत नसेल पण धवल मात्र पुस्तक (पोथी) घेऊन नेहमी पूजा सांगतो.सर्व जण पुर्वीवत  आपापला दागिना पूजेत देतात . लक्ष्मी पूजनाला माझे अनारसे  असतात .व थाटाने लक्ष्मी पूजन साजरे होते
         भाऊबीज म्हटली की  ताईची,' ए  मी दोन बोटे तेल लावते म्हणत, पण तिच्या ऐवजी  भाचे मंडळीकडून तेल लावून घेणे , तेल लावणे कसले? रगडून घेणे मामालोकांचे चालावयाचे .नातवंडे पण  नातीनकडून म्हणजे सीमा, सोनाली, अमिता मुग्धा कडून भाऊबीज हवीय ना?मग आम्हाला तेल लावा बर का ! अशा गमती जमतीत भाऊबीज व्हायची .
          दिवाळीत रात्री फटाके वाजविचा कार्यक्रम असायचा .हो ना.! अजून  आरती साधना वाजवितात
  का ग फटाके ? दोघी जणी धावून  धावून फटाके फोडावयाच्या.व मनीषा मात्र वरूनच  कानावर हात ठेवून घाबरत असायची .एका दिवाळीत  श्रेयसची बोटे भाजली होती.तरी अनिल ,अजितचे अरे मुलांनो सुती कपडे घाला, .पायात प्रत्येकाने  स्लीपर घातल्या आहेत ना? वगैरे आदेश अथवा सूचना चालूच असायच्या हो ना !  हो .हो अजूनही तसेच फटाके फोडणे चालू आहे .पण आता नातवंडा  ऐवजी आपली पतवंडे ,पणतू मंडळीअसतात. नेहा नील ईशान रोहन आदित्य अनुष्का व कधी मधी सीमा अमिता परदेशातून आल्यातर सायली, ओजस ,सानिका यांची भर होते .पुढल्या वर्षी धवलचा निखील पण असेल. आपले  जावई,,अरुणराव, अजून पण  नेमाने पणतू मंडळींना घेऊन फटाके वाजवावयास जातात
 .
          दिवाळीत एक  दिवस भजनाचा कार्यक्रम असतोच .पूर्वी प्रमाणेच धवल,केदारची तबल्याची साथ, सचिनची पेटीची ,श्रेयसची सिंथेसायजरची साथ व माझ्या हातात झांज असे साथ संगत करत भजन रंगते.आता मुलींबरोबर   मुग्धा,  अमिता सीमा सोनू  म्हणजे या नातींच्या बरोबर कल्याणी ,अनुजा स्नेहा या नात सुना कडून पण भक्ती गीते सादर होतात .व या सर्व कार्यक्रमाचे चित्रण अनघा नीट करून दिवाळीच्या आठवणी ताज्या ठेवण्याचे काम करते .लगेच सोनू लगबगीने  कॉमप्यूटर वर फोटो लोड करून  प्रत्येकाच्या घरी झालेली दिवाळी फोटो व्दारे पोहचती करते
        आता बदल म्हणजे एक दिवस दिवाळीत  औटिंगला जातो. तुम्ही असतांना थोरल्याच्या प्लॉटवर बोपालला ,पुढे एकदा लोणावळा , तर एकदा भिडे वाडीला तर एकदा, दोन दिवसा साठी अलिबागला  .तर गेल्या वर्षी  कर्जतला फार्मवर गेलो होतो .त्या योगाने शशी चे  फार्म हाउस पाहिले. असे नवीन बदलत्या काळा प्रमाणे  औटिंग चे प्रोग्राम करून  दिवाळीची रंगत वाढवीत दिवाळी साजरी होत आहे .
      तेव्हा सांगावयाचे काय ? अजूनहि  पूर्वी सारखीच दिवाळी साजरी होत आहे .मी खरोखरी सुखी आहे हो  कारण तुम्ही घालून पायंडा प्रमाणे आज तोवर मुले एकत्र येऊन , दिवाळी मी त्यांच्या सोबत व मुले माझ्या सोबत दिवाळी साजरी करत आहोत .यंदा भले दिवाळी  रोडावली असेल पुढच्या वर्षी पुन्हा दिवाळीस उधाण नक्कीच येईल .




 थोडा बदल करून.  स्वप्न गंध दिवाळी अंकासाठी 



डिसेंबर मधे लग्न झाले. आणि आता   पहिली दिवाळी होती.गावात सासर माहेर. त्यामुळे दिवाळी निमित्ताने एक दिवस माहेरी जाऊन दिवाळसण साजरा करणार होते. व गावात माहेर म्हटले की इतर वेळी जाणे होतच असते. तरी आमच्या कडे म्हणजे सासरी दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असते. मोठे दीर गुजरात मधे सर्विस निमित्ताने असतात. धाकटा दीर पुण्यात. पण दिवाळीत सारे नेहमीच कोणा एका कडे एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, आणि फिरती दिवाळी असते. एकदा मुंबई तर  कधी पुणे तर मोठे दीर गुजरात मधे तेथे अहमदाबाद ला. त्यामुळे दरवर्षी वेगळा उत्साह असतो. 
         पण यंदाची दिवाळी  अजित कडे पुण्यास होती.      माझ्या साठी पहिलीच दिवाळी.  मी नवी सून आलेली पण.  ऐकून होते दिवाळी एकदम धूम धडाक्यात साजरी होते. पण यंदाची दिवाळी जणू काही मोठया  मंडळीची    अथवा सिनिअर सिटीझनच होती .एक मी सोडून व दुसरी नात सोडली तर कोणीच नातवंडे आली नव्हती. 
       विमला बाईंच्या मोठ्या सासू बाई,  माझ्या सासू , मुले, जावई व मुलगी एवढीच मंडळी एकत्र  होणार होते.दिवंगत नव-याच्या फोटोकडे पहात विमलाबाई विचार करत होत्या.मधेच मनांत  हसत होत्या. त्यांना  फोटोतून आवाज आल्याचा भास त्यांना झाला,
    "काय ग विमल यंदाची, आपल्या कुटुंबाची दिवाळी रोडावल्या सारखी वाटतेय ? " हो ना ! " नातवंडे म्हणजे आपली चिमणे पाखरे पंख  विस्तारून दूर गेली आहेत आणि आयुष्यात उंच उंच भरा-या घेतल्याच पाहिजेत ना! आता नातवंडे साता समुद्रापार त्यांचे  उज्वल भवितव्य  घडविण्यात व नाती त्यांच्या त्यांच्या सासरी व नात  सुना आपल्या नातवंडा बरोबर दूर परदेशात आहेत  .आपला काळ वेगळा होता .मुले भारतातच होती. येऊन जाऊन थोरला फक्त दूर असायचा.येऊन जाऊन थोरला फक्त दूर असायचा दूर म्हणजे अहमदाबाद ला".आणि   एखाद वर्षी अनिल पण बेहरीनला असल्याने दिवाळीत नव्हता.  पण बाकी सर्व वर्षी मुले एकत्र होती व असायचीच .दिवाळी म्हटली की एखाद मंगलकार्य असावे असे सर्व जण एकत्र यावयाचे  . पुढे त्यांची कुटुंबे पण  वाढत गेलीत तरी सर्व नातवंडे ठरल्या प्रमाणे उत्साहाने एकमेकांना भेटणार या ओढीने, आठवणीने यावयाची .एकत्र जमायची, खेळायची . असे विमलबाईचे फोटो शी संभाषण मनात चालले होते.मग त्या मला म्हणाल्या बरका सूनबाई,
      "दिवाळीत   एक सून, मुलांना म्हणजे  नातवंडांना पकडून अंघोळी घालण्यात, तर एक स्वयंपाकात, तर एक सून   फराळाचे  पहाण्यात  गर्क असावयाची आणि माझ्या आठवणीत आहे ते चित्र अजून.
आमची ताई हॉलमध्ये एक पाय पसरून व तिच्या आजू बाजूला सर्वांनी आणलेले फराळाचे डबे ठेवून बसलेली  आणि तोंडाने," अरे ,मुलांना काचेच्या डिश नको ,त्या कागदी डिश दे अथवा त्या  मासिकाचे कागद फाड.अजित तू  काढून ठेवली आहेत ना ?"असे म्हणत असायची.आणि त्यात मुलांचा गलका "ए मला रवा लाडू दे ,तर दुसरा ए, मला रवा लाडू नको, मला बेसन लाडू दे ,मला चकली नाही दिली, मला दोन चकल्या दे .आणि दाल मुठ पण हवीय मला ".असा गलका, गोंधळ चालू असायचा .हो!साधनाच्या तुझ्या  सासूच्या दाल मुठ शिवाय दिवाळीला  पूर्णता  नाही .हो. त्यात मधेच ताईचे  सांगणे असावयाचे की अग साधना त्याबाजूला अर्धा अर्धा कप चहा टाक, तुमच्या गुजराथी पद्धतीचा दुध पाणी मिक्स . आणि मुलांनो, तुम्ही आधी खाऊन घ्या ,मग या  बाजूला या मी पाणी देते "अशी तिची बडबड तोंडाने चालू असायची,त्यात कोणाचा तरी उठताना भरलेल्या पाण्याच्या ग्लासला पाय लागावयाचा की अरे फडके आणा तिथून असा गलका सुरु  व्हायचा . घर कसे भरलेले असावयाचे..

            आणि त्या पुढे बोलत्या झाल्या,"अगं पाडव्याला मुले आपापल्या बायकांना काही तरी गिफ्ट वस्तू ,दागिना आणावयाचे.मग कोणाचा पाडवा किती भारी यावर चर्चा चेष्टा,विनोद गप्पा व्हायचा . माझ्या पासून ओवाळ्णीस सुरुवात व्हायची. आमचे हे, नेहमी प्रमाणे हातातील अंगठी काढून ताम्हनात टाकावयाचे .आणि हो लक्ष्मी पूजनाला ते पूजा सांगावयाचे  तशी च पुजा धवल  सांगतो , पण धवल मात्र पुस्तक (पोथी) घेऊन नेहमी पूजा सांगतो.सर्व जण  आपापला दागिना पूजेत देतात . लक्ष्मी पूजनाला माझे अनारसे  असायचे.व थाटाने लक्ष्मी पूजन साजरे होते.

      भाऊबीज म्हटली की   ताई ग आपली , "ए  मी दोन बोटे तेल लावते म्हणाली  पण तिच्या ऐवजी  भाचे मंडळीकडून तेल लावून घेणे , तेल लावणे कसले? रगडून घेणे मामालोकांचे चालावयाचे .नातवंडे पण  नातीनकडून म्हणजे सीमा, सोनाली, अमिता मुग्धा कडून भाऊबीज हवीय ना?मग आम्हाला तेल लावा बर का ! अशा गमती जमतीत भाऊबीज व्हायची .
    
दिवाळीत एक  दिवस भजनाचा कार्यक्रम असतोच .पूर्वी प्रमाणेच धवल,केदारची तबल्याची साथ, सचिनची पेटीची ,श्रेयसची सिंथेसायजरची साथ व माझ्या हातात झांज असे साथ संगत करत भजन रंगते.आता मुलींबरोबर   मुग्धा,  अमिता सीमा सोनू  म्हणजे या नातींच्या बरोबर कल्याणी ,अनुजा स्नेहा या नात सुना कडून पण भक्ती गीते सादर होतात .व या सर्व कार्यक्रमाचे चित्रण अनघा नीट करून दिवाळीच्या आठवणी ताज्या ठेवण्याचे काम करते .लगेच सोनू लगबगीने  कॉमप्यूटर वर फोटो लोड करून  प्रत्येकाच्या घरी झालेली दिवाळी फोटो व्दारे पोहचती करते.
           आता बदल म्हणजे एक दिवस दिवाळीत  औटिंगला जातो. तुम्ही असतांना थोरल्याच्या प्लॉटवर बोपालला ,पुढे एकदा लोणावळा , तर एकदा भिडे वाडीला तर एकदा, दोन दिवसा साठी अलिबागला  .तर गेल्या वर्षी  कर्जतला फार्मवर गेलो होतो .त्या योगाने शशी चे  फार्म हाउस पाहिले. असे नवीन बदलत्या काळा प्रमाणे  औटिंग चे प्रोग्राम करून  दिवाळीची रंगत वाढवीत दिवाळी साजरी होत आहे .
      तेव्हा सांगावयाचे काय ? अजूनही   पूर्वी सारखीच दिवाळी साजरी होत आहे .मी खरोखरी सुखी आहे हो
आता तुम्हाला हा वारसा पुढे चालवायचा आहे. 
      मी पण सारे वर्णन  त्यांच्या तोंडून ऐकले . मन कसे आनंदित झाले. खरच दिवाळीला एकत्र होऊन दिवाळी साजरी करण्यात किती मजा आहे ना. छान परंपरा जपलीय  आपल्या कुटुंबाने. मला पण आनंदाने उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात हुरूप आला. 




 

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

मन पाखरू पाखरू \घायाळ मन/मन माझे / मन( अष्टाक्षरी /मनाशी संवाद मनस्थिती मनस्थिती


 
                                                          मन पाखरू पाखरू
       स्नेहा नुकत्याच झालेल्या स्वत:च्या साखरपुड्याच्या समारंभाचा कोम्पुटर   वर लोड केलेला अल्बमचा  स्लाईड शों पहात होती.आणि बाजूला मराठी गाणी लावली होती .
                                       मी  मनांत हसता प्रीत हसे
                                        हे गुपित कुणाला सांगू कसे ?
गाणे वाजत होते गाणे. गुणगुणत मनाशीच हसत , पुन्हा  पुन्हा  दोघांचे फोटो न्याहाळीत होती. लग्नात कुठल्या प्रकारच्या,कोणत्या रंगाच्या साड्या  घ्यायच्या ,पैठणी कोणत्या  रंगाची घ्यायची, हेअर स्टाईल कशी करावयाची ब्युटी  पार्लरची  अपोईटमेंट कधी ,किती दिवस अगोदर घ्यायची ? हनीमूनला जाताना कोणते कपडे  न्यायचे ? वगैरे विचार करत होती .मनाचे पाखरू इकडून तिकडे बागडत अनेक विचार करत होते .मन  पाखरू थेट लग्न  समारंभा पर्यंत जाऊन पोहचले होते. खरच आहे . असेच असते .मनच  ते.त्याला पाखरू काय उगाच म्हणतात ? पाखरू जसे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छदाने उडत भरकटत असते.तसेच मन पण या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत असते. म्हणून तर त्याला चंचल असे म्हटले जाते  ,
        महाभारतात  यक्षाने  युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न होता.जगात सर्वात गतिमान काय ? तर युधिष्टीराने  क्षणात उत्तर दिले " मन " , मनासारखे  गतिमान काहीच नाही . क्षणात बसल्या जागी  पृथ्वी  प्रदक्षिणा करून येणारे,तिन्ही लोकात , तिन्ही जगात इतकेच नव्हे तर तिन्ही काळात फिरून येणारे मनच असते .गत जन्माच्या स्मृतीतून गेल्या जन्मात फिरून येते.
       जुन्या आठवणीत मन भूतकाळात जाते. जुन्या वस्तू हाताळताना, फोटो पहाताना मन सहजतेने भूतकाळाशी समरस  एकरूप होते. विचारांनी ,कल्पनांनी ,स्वन्पातून मन भविष्य ,भूत ,वर्तमानात सहजतेने विहरते,बागडते,भरकटते भरारी घेते .
        देवाने माणसाला डोक्यात मेंदू व शरीरात मन बहाल करून खूपच कृपा केली आहे.त्या मनाचा तो राजा असतो. दोन  अक्षरी साधा सुधा वाटणारा शब्द "मन " त्याला किती पैलू आहेत. राग ,लोभ ,द्वेष,भय,  आनंद ,दु:ख मद,मोह मत्सर इत्यादी. या पैलू  मुळेच मनाला भावना प्राप्त होतात .हेच मन माणसाला मस्त मजेत  जगावयाला  शिकवते.हे मन सुंदर ,सुद्दृढ , निर्मल असे असते. त्यासाठी त्यावर चांगली  जडण घडण करावी लागते ..
     लहानपणात मन निरागस असते.त्याला लोभ ,दु;ख ,काळजी , किंव्हा भय वगैरे पैलू  पडलेले नसतात .पुढे जवाबदारी मुळे, मोठे झाल्याने, विशिष्ठ संस्कार धडवून  वा  करून त्या  मनाची जडण  घडण होते. चांगले- वाईट,आपले-दुस-यांचे ,तुझे-माझे,वगैरे भावना स्पर्शतात .मग मनाचा कठोरपणा  वाढतो. दुजाभाव,मोह,स्पर्धा  इर्षा स्वार्थ वगैरे पैलू दिसू लागतात . हेच मन पाखरू , भरकटणारे मन या व्यावहारिक जीवनात रागाने ,द्वेषाने,इर्षेने, स्वार्थाने बसल्याजागी इतरांचा हेवा करते .वाईट चिंतते वा  इच्छ्ते .म्हणूनच इंग्लिश  मध्ये म्हण
आहे ना , empty  mind  is devil work shop                        
    हेच  मन पाखरू  प्रियजनांची काळजी,चिंता करत असतांना कटू प्रसंगी नको नको ते चिंतते.अगदी शत्रू
पण विचार करणार नाही असे वाईट विचार करत रहाते.म्हणून त्या मन पाखरा साठी "मन चिंती ते वैरी पण न चिंती "म्हण रूढ झालेली आहे .तर कधी हे मन पाखरू शेख  चील्लीतल्या गोष्ट्यी सारखे विचारांच्या ढगात गुरफटत भरकटत जाते . "मी हे करीन, मी ते करीन,मग असे होईल, मला असे वा अमुक करता येईल, मला असे काही मिळवता येईल,.मी अमुक करून दाखवीन.' असे विचार करत, विचारांच्या ढगातले मन, काचेचे  भांडे खळकन फुटावे तसे विचारांचे ढग हवेत कोलमडतात .आणि म्हणतात ना  जसे,
"मनातले मांडे मनातच रहातात "
.       यौवनात स्वप्नाळू पणे भविष्याची स्वप्ने हेच मन पाखरू रंगविते. मनानी अनेक प्रवास करते  अथवा केलेली प्रवास ठिकाणे गप्पा गोष्टीतून  पुन्हा फिरून येते .नवीन घर  बांधते ,सजवते ,त्यात मन विसावते सुखावते . आकाशात सूर्योदयी व  सुर्यास्ती जसे रंग बदलतात त्या प्रमाणे मन पाखरूचे रंग क्षणोक्षणी बदलत  असतात .
        स्वप्न म्हणजे पण काय ? दिवस भरात वा  कधी काळी केलेल्या विचारांचे मनाचे खेळ .म्हणून म्हणतात्त  'मनी वसे ते स्वप्नी दिसे ' मनातील विचार अंधुकपणे स्वप्नात दिसतात .
       रामदास  स्वामींनी या  मनास जिंका, त्यावर  काबू  मिळवा याबद्दल "मनाचे  श्लोक" लिहून मनास कसे वळण लावावे .हे उत्तम रित्या सांगितले आहे ..जो मन जिंकतो तो जग  जिंकतो .हे काही खोटे नाही .पण हे मन पाखरू फार चंचल असल्याने त्यावर ताबा मिळविणे फार कठीण आहे. संत लोकांचे वेगळे आहे त्यांचे तृप्त मन जगाला आनंद देण्यासाठी आहे." आर्ट ऑफ लीविग" अथवा योगशिबिरातून पण आज काल थोडा  फार मनावर  ताबा काबु मिळवण्याचे प्रयत्न  आपण करतो .
      यश ,वैभव आनंद ,प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात .पण आपणास हे प्रयत्न करण्यास आपले मनच  उद्युक्त करत असते .यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जिद्द हवी असते. धैर्य हवे असते .आत्मविश्वास हवा असतो. आणि हे सारे आपल्या मनातच असते.  आपल्याला जे हवे असते ते मनच आपल्याला देऊ शकते. मन आपल्याकडे खूप  काही सतत मागत असते, पण या  मनाकडे  आपणही खूप काही मागू शकतो .म्हणून हे मनच प्रसन्न झाले तर आपण हवे ते मिळवू शकतो. म्हणूनच म्हणतात ," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन " तेव्हा या भरकटणा-या  मनास प्रसन्न करणे आवश्यक आहे .मन प्रसन्न तर सर्व काही प्राप्त होते .
    
  

अभाशम ठाणे जिल्ला समूह 1
उपक्रम 
विषय - घायाळ मन

मन असते कोमल
दुखावते  ते सहज
विचारांती बोलावे
समजून बोलणे गरज

शस्त्र  करीती इजा
होते  उपाये ती बरी
पण शब्द करी घायाल
औषध काम न करी

फुलापरी  असे मन
सदा तयास  जपावे
दुःखद वार्ता कानी
सैरावैरा मन धावे

पहाता भीषण प्रसंग
मन होतसे  उदास
काही वेळा साठी
वाटे मनास भकास


मन करु नये घायाल
 त्रास होतसे जीवास
स्मरताची  ईश्वरास
शांति मिळे मनास


वैशाली वर्तक 






कवी संजीव प्रतिष्ठान
आयोजित 
कवी संजीव काव्य लेखन स्पर्धा2022
विषय - मन माझे  मन माझे

 * संतृप्त मन*


मन   माझे कोमल
दुखावते ते सहज
विचारांती मी बोलते
समजून बोलणे गरज

  मन  अल्लड बालपणी
होता  मातीचाच गोळा
मायबापांच्या  संस्कार कृपे
 आज आनंदाचा सोहळा

होता कळीचे फूल माझे
मन धावे सुसाट वा-यापरी
 भूईवर तर क्षणात नभी
आवरू न शके आजवरी

मन झाले शब्दांचे पाखरु
धावे लेखणीतूनी क्षणा क्षणा
नाना रसातूनी न्हाऊन ते
आनंद देते जना मना


पहाता  भीषण प्रसंग
मन  माझे होतसे  उदास
काही वेळा  साठी तर
भासे मनास भकास


अनुभवे जाता काळ
 मन संतोषी आनंदले
प्रसन्नता लाभे जीवा
 हर्षे मन विसावले

वैशाली वर्तक 
अहमदाबाद  (  गुजरात)








अधीर मन*


ध्यानी मनी स्मरे तुज
तुझ्या  नामाचे रटण
 राहो तुझे रुप चित्ती 
सदा करिते स्मरण


मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
आसावला जीव वेडा
गाते तव गुणगान    


तुझ्या नामाचा गजर
चाले सदा   क्षणो क्षणी
   आसावला जीव वेडा
  आस दर्शनाची मनी


माते तव दर्शनाला
मन माझे आतुरले 
कधी पाहीन तुजला
मन माझे अधीरले


 
मन माझे आनंदेल
प्रसन्नता लाभे जीवा
तव रूप पाहुनिया  
आसावल्या वेडा जी

 आस लागली अंतरी
आले आता मी शरण
आसावला जीव वेडा
दाखवावे तव चरण

वैशाली वर्तक 

अहमदाबाद





  ओळ काव्य -मज राहवले नाही


   शीर्षक - *ओढ*


भेट आपुली  पहिली

 *मज  नाही राहवले*

माझ्या  विचलित मना   

तूची   मज सावरले           1



पहिल्याच भेटीतला

वाटे अश्वासक   स्पर्श 

 दिले अनामिक सुख

देतो मना सदा हर्ष            2


छंद तुला  बघण्याचा

कसे आवरु मनाला

तुझाओझरता स्पर्श 

वेड लावितो जीवाला        3 


गंध तुझ्याच  प्रीतीचा

सदा   रहातो अंतरी 

रोज वसंत फुलेल       

 विश्वासाने ऊर भरी           4


सख्या येता सांजवेळ

उजळती आठवणी

मज नाही रहावले

प्रीत गंध स्मरे  मनी          5                             



LMD 37


आधीर मन

मन माझे  झालेअधीर
सदैव तुला भेटण्यास
कधी येशील जवळी
सांग माझ्या  मनास

   मनास छंद तुज पहाण्याचा
कसे आवरु  मम मनाला
तुझाओझरता स्पर्श 
वेड लावितो जीवाला 

तव रूप पाहुनिया  
मन माझे आनंदेल
प्रसन्नता लाभे जीवा
हर्षे मन विसावले

81414







अ भा ठाणे जिल्हा समूह 1
आयोजित उपक्रम क्रमांक
4/4/23
विषय. मनाशी संवाद 

मनाशी  साधवा संवाद
जातो त्यात वेळ जरा
मिळता निवांतात वेळ
मनःशांती साठी  उपाय बरा. 

उघडावे अनुभवाचे गाठोडे
गतकालीन चुका सांगे मन
मिळे प्रेरणा सुधारण्या
उज्वल भविष्य दावी क्षण

संवाद मनाशी  साधता
मन रंगवे   स्वप्ने सप्तरंगी
करण्या पूर्तता विचार मालिका
सहज तरारते  अंतरंगी

 जसे स्वरूप दावी दर्पण
   साधिता मनाशी संवाद
 अंतर्मन होई निर्मळ
 नुरे मग वाद विवाद.

वैशाली वर्तक
अहमदाबाद
 





      कल्याण  डोंबिवली महानगरसमूह 2 आयोजित  उपक्रम
5/7/22
विषय - मन माझे फुलपाखरु

       झाले मन पाखरु

मन  असतेच पाखरु
जसे फुलपाखरु चंचल
क्षणा क्षणाला भिरभिरे
 मनही असते चपळ

पाहूनी फुल-पाखरास
मन माझे  आले फिरुनी
गतकाळातूनी वर्तमानी
काळ सरला नजरेतूनी

घर बसल्या  मन फिरले
उगा का वदताती जन
न  आवरे आवरिता
त्याच स्थितीत होते मम मन

मिळाला थोडा विरंगुळा
मनाने  केले मनोरंजन
हेच तर  त्याचे  असे लक्षण
आनंदात जाती काही क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



          अ भारतीय मसाप ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम
विषय.. मनस्थिती मनस्थिती 

जशी घडते घटना 
मन होई विचलित
नाचे मन आनंदाने
मन विभोर  होते  खचित

 येता प्रसंग तो बाका
मनस्थिती भयभीत
काही सुचेना क्षणभर
काय करावे अवचित

सुख दुःखाचा जीवनी
चाले  सदोदित खेळ
पण ठेवता मन शांत
साधावा लागतो मेळ

 रामादासांचे  मनाचे श्लोक
 अशा वेळी येती कामी
मनस्थिती शांत राखण्या
पठण श्लोकांचे युक्ती नामी

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मराठी साहित्य  मंडळ गुजरात प्रदेश  आयोजित  काव्य लेखन स्पर्धासाठी
विषय -- **मन हे फुलपाखरु*



मन कधीच न असे दृश्य
तरी मन दावी तयाचे महत्त्व
जन म्हणती ते वसे हृदयात
  कर्मातूनी दिसे त्याचे अस्तित्व .

मन असे बुध्दी च्या कह्यात
तना करवी, काम होई क्षणात
 येता विचार , मन धावे सैरावैरा
नसे कोणी तयासम गतीशील जगात.


पाखरु असे मन सदा चंचल
फिरुन येती जरी बसता घरी
भिरभिरे फुला वरुनी त्या फूली
 येई फिरुनी क्षणार्धात  जगभरी.

मन ठेवावे सदा निर्मल
न जडावे तयास  मनो-विकार
काम क्रोध मोह माया लोभ पासूनी
दूर रहाण्या, करावा सद् विचार

मन ठेवावे  सदा काळ प्रसन्न
मिळते तयातच समाधान
सर्व  ईच्छा वसती मनातच
तेचि सर्व  सिध्दीचे   साधन

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात
                                                               



मनस्पर्शी समूह वर काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी 
########################
संतृप्त मन मन ऊडुऊडू झाले 
#####################



मन   माझे कोमल
दुखावते ते सहज
विचारांती मी बोलते
समजून बोलणे गरज


  मन  अल्लड बालपणी
होता  मातीचाच गोळा
मायबापांच्या  संस्कार कृपे
 आज आनंदाचा सोहळा


होता कळीचे फूल माझे
मन धावे सुसाट वा-यापरी
 भूईवर तर क्षणात नभी
आवरू न शके आजवरी


मन झाले शब्दांचे पाखरु
धावे लेखणीतूनी क्षणा क्षणा
नाना रसातूनी न्हाऊन ते
आनंद देते जना मना


पहाता  भीषण प्रसंग
मन  माझे होतसे  उदास
काही वेळा  साठी तर
भासे मनास भकास


दिले कौटुंबिक  सुख देवाने
मार्गी लागली मुले जीवनी
कर्तृत्वाने नाव उजळले त्यांनी
समाधान लाभले  मनोमनी


दिले देवाने सुदृढ शरीर
अजून काय हवे मनाला
मन उडू उडू झालं
यश मिळाले मोद जीवाला




वैशाली वर्तक 

अहमदाबाद  (  गुजरात)

आनंदी मन
_----------------- 
 शीर्षक.   .मन उडु उडु झाले 
 _______'___:


किती साधे कारण ते

 ऊडु ऊडु झाल मन

ठरविलेली कामे झाली

आनंदाने उजळले क्षण


होते असे कधीतरी

मिळते  मना समाधान

होता खूष मन त्याक्षणी

वाटे देवाने दिले वरदान


 दिले कौटुंबिक  सुख देवाने

मार्गी लागली मुले जीवनी

कर्तृत्वाने नाव उजळले त्यांनी

समाधान लाभले  मनोमनी


दिले देवाने सुदृढ शरीर

अजून काय हवे मनाला

मन उडू उडू झालं

यश मिळाले मोद जीवाला






बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

bhel

                                                                 भेळ    
     भगिनी समाजाच्या आनंद मेळ्यास गेलो होतो.बरेच खाद्य पदार्थांची छोटी दुकाने लावलेली होती.
 .पण"मुंबई भेळ " या दुकानावर गर्दी अमाप होती .भेळेचाच स्टोल,गर्दी असणारच. भेळ म्हटली की
 पोटभर जेवल्यावर पण  एखादी भेळेची डीश शेअर  करावयास हरकत नसते.कारण भेळ पदार्थच
 अतिशयरुचकर ना ! तोंडाला नुसती चवच नाही पण भूक पण चाळवणारा पदार्थ .खरेच चुरमुरे कुरमुरे
 त्यातवाफवून कुसकरलेले बटाटे, बारीक चिरलेला  टोमेटो  ,मैद्याच्या पुरीचे चुरलेले तुकडे ,मीठ ,फरसाण, त्यात चिंचेच्या आंबट गोड  चटणीने , मिरची कोथिंबीर पुदिन्याच्या हिरव्या तिखट
 चटणीच्या  पाण्याने  सर्व पदार्थाचे नीट  मिश्रण करून वर बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव,  बारीक चिरलेली कोथिंबीर व त्यात लाल चुटूक अनारचे (डाळिंबाचे) दाणे,काय शोभिवंत  दिसते ना भेळ ! नुसते वर्णन ऐकूनच तोंडास पाणी सुटले ना ?
     भेळ म्हणजे तरी काय ? मिश्रण.निवडक खाद्य पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण म्हणजे भेळ.
तसे पहिले तर   स्वयंपाक कृतीत अनेक पदार्थांचे मिश्रणच असते .व त्या योग्य मिश्रणाने पदार्थ तयार होतो. सर्वच खाद्य पदार्थ,पदार्थांचे मिश्रण करून म्हणा अथवा भेळ करून म्हणा तयार होतात .त्याच खाद्य पदार्थास अनेक मसाल्याच्या  पदार्थांची भेळ करून  म्हणजे लवंग, तमालपत्र ,दालचिनी वगैरे मसाल्यांचे  एकत्रीकरण  करून वा मसाल्याच्या जिन्नसांची  भेळ करून खाद्य पदार्थांची रसना ,चव वाढविण्याचे काम , ही  मसाल्याच्या जिन्नसांची भेळच  करते.
     एवढेच काय भौतिक शास्त्रात पहा, धातूंच्या मिश्रणाने म्हणजे, दोन अथवा अधिक धातुंचे एकत्रीकरण  करून, भेळ करून वा मिश्रणातून धातू बनवितात .ज्या धातू वाहतुकीची साधनात, औधोगिक क्षेत्रात यंत्रातून  अनेक ठिकाणी वापरण्यात येतात.
     रसायन शास्त्रात  तर निव्वळ अनेक घटकांची भेळ अथवा मिश्रण आहे .आणि त्या मिश्रणातूनच रासायनिक पदार्थ तयार होतात .साबण ,औषधे ,कॉस्मेटिक्स ,खते , पेस्ट , मंजन वगैरे यात, तसेच रंगांत पण रंग, तेल व इतर प्रवाही घटकांचे मिश्रणाने रंग बनतात .तसेच प्रवाही घटकांचे मिश्रण करून, भेळ करून योग्य मिश्रणाने रासायनिक प्रवाही पदार्थ पण बनतात .
 .  रसायनातील नैसर्गिक प्रवाही पदार्थ पाणी.ते पण हायड्रोजन व ऑकसीजनचे  मिश्रणच आहे ना !
त्याच प्रमाणे वायूंचे विघटन केले तर कळते त्यात पण दोन अथवा अधिक घटकांची भेळ-मिश्रण
आहेच
    तसेच कापड उद्योगात पण ६०/४०अथवा ६०/३० .असे सुती व सिंथेटिक धाग्यांचे मिश्रण असतेच
 ना ?व  जेव्हां  असे मिश्रण नसते तेव्हां १००%सुती अथवा १००% रेशीम असे लेबल लावतात .
    सूर्य प्रकाशाचे किरण पावसाच्या थेंबातून जेव्हां प्रसार होते. त्या प्रकाशाचे पृथक्करण होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते .म्हणजे सूर्यप्रकाश पण सप्तरंगाचे मिश्रणच आहे .आपले शरीर पण पंच महाभूतांचे योग्य प्रमाणात मिश्रणच होऊन बनलेले आहे .
     इतकेच नव्हे  तर कुठलीही  भाषा म्हणजे काय ? शब्दांचा योग्य समूह .त्यात शब्दांचे योग्य मिश्रण करून जोड शब्द तयार होतात .हे जोडशब्द म्हणजे शब्दांचे मिश्रण.व ते भाषेचा दर्जा वाढवितात.भाषेच्या व्याकरणात भर करतात .भाषेला समृद्ध करतात. जसे पंचपाळे,त्रिमूर्ती , नवरात्री वगैरे शब्दांनी भाषेच्या व्याकरणात समास तयार करतात .तसेच अनेक शब्दांना एक शब्द देऊन जसे गजानन ज्याचे मुख गजाचे आहे असा , कमलनयन ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा ,अथवा  मीनाक्षी जिचे डोळे माशाच्या आकाराचे आहेत अशी,असे जोड शब्द वा दोन  शब्दांची भेळ  -मिश्रण करून भाषेचा कस वाढतो .
     इतकेच नव्हे तर आपल्या भारतात सर्व जातीचे अनेक  धर्माचे , वेगवेगळ्या भाषा बोलणारे  लोक राहतात .सर्व जाती धर्माचे  लोक गुण्या गोविंदाने राहतात.  ती पण  एक उत्तम भेळच आहे .
      तेव्हा काय भेळ ही सर्वत्र  आहेच. पण भेळ शब्दात भे आणि ळ यात मध्ये स अक्षर नसावे  नाहीतर
भेसळ  शब्द तयार होतो .आणि ती योग्य नाही .जसे बांधकामात रेती, सिमेंटचे योग्य प्रमाण ठेवले नाही तर बांधकाम कच्चे होते .सोनाराने सोन्याचे दागिने बनवितांना तांबे जास्त मिसळले तर सोन्याचा कस  कमी होतो.खाद्य पदार्थात टीप कागदचा क्रीम म्हणून तसेच  लाकडाचा भुसा वा इतर वस्तूंचा व्यापारी लोक खाद्य पदार्थात वापर करतात. ती भेळ नव्हे  ती भेसळ आहे . व तसे करणे अयोग्य आहे . सध्या आपण पाहतो नको त्या व  तसेच शरीरास अपायकारक  अश्या वस्तू खाद्य पदार्थात राजरोस  वापरतात व त्यामुळे आता अश्या खाद्य पदार्थान वर बंदी  आणली आहे . कारण ती अयोग्य आहे हानिकारक आहे
      तर सर्वच क्षेत्रात भेळ आहे. पण भेसळ  नसावी .ज्या त्या क्षेत्रात भेळ करतांना सर्वांनी थोडी
नितीमत्तेची, उत्पादकांनी  गुणवत्तेची चाड ठेवली तर सर्व क्षेत्रात सुखद ,सात्विक, चवदार, सकस,कसदार पोषक वस्तूंची  तसेच पदार्थांच्या उत्पादनांची उत्तम भेळ अनुभवता येईल .

 

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...