शनिवार, १ डिसेंबर, २०१८

काव्यांजली गणेश विसर्जन

काव्यांजलीः ..
. गणेशाचे विसर्जन

 पहाता पहाता
 आला दिन विसर्जनचा
 निरोप घेण्याचा
 गणेशाचा.

 विसर्जनाचा दिन
 जीवा लागे हूरहूर
 दाटले काहूर
 मनोमनी

. संपता आरती
 पाणावली जनांची लोचने ,
 गणेशाचे परतणे
 सहवेना.

 गणपती बाप्पा
 निघाले आपुल्या सदनी
 नयनात पाणी
 प्रत्येकाच्या

 मोरयाचा गजरात
 भक्ती भाव एकवटून
 सांगती परतून
 यावेपुन्हा

 मृत्तिकाची मूर्ती
 सहज विसर्जली पाण्यात
 पर्यावरण जपत
 सहजपणे .

 तुझी कृपा
  मजवरी राहो सदा
 मागणे आता
 तुजपायी


       वैशाली वर्तक (अहमदाबाद ) ,







माझी  लेखणी भक्तीसागर मंच
विषय - *क्षण विरहाचे सारे*
        

*विसर्जन*

आला आला म्हणतात 
झाली वेळ परतीची
नको वाटे त्याचे जाणे
 वेळ आली विसर्जनाची

दहा दिवस मोदात
येणे जाणे स्व जनांचे
किती गप्पागोष्टी खेळ
दिन होते आनंदाचे

सजावट वाटे फिकी
धूप दीप मंदावले
  घर झाले सुने सुने
बाप्पा गृही परतले


 बाप्पा बाप्पा म्हणताना
डोळे पाणावले क्षणी
जड मनाने निघालो
विरहाचे दुःख  मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

वचन


- वचन
देतो वचन जवान मनस्वी
देश रक्षणा राहीन तत्पर
येवोत कितीही संकटे मजवरी
वचनबध्द सैनिक आहे सत्वर

           सप्तपदी विधी लग्नातला
           असे सात वचनांचे पालन
           अनुसरता त्या पावलांना
          होते सुखी जीवनाचे कारण

कैकयीने मागता वर
दशरथ पडला विचारात
धाडावे लागले वनीं रामास
दिलेले वचन पाळण्यात

           घेतात देवाला स्मरुनी
           डाॕक्टर , वचन स्व-पेशाची
           सुश्रृषा करिती लोकांची
           निस्वार्थ बुद्धीने ऋग्णाची
.
नागरिक सारे आपण बांधव
केवळ न करिता प्रतिज्ञा वाचन
वचन घेऊन  प्रत्येकाने
वर्तले , तरच होते वचनांचे पालन ...

       .... ........ वैशाली वर्तक

दिवाळी (अष्टाक्षरी)


विषय ः-दिवाळी

         दिपावली असे सण   
         माझ्या  सदा आवडीचा
         आनंदाची उधळण
         दावी  रूप  संस्कृतीचा 
                    आला सण दिवाळीचा 
                     स्नेह ज्योती उजळिल्या
                      सजलीत घरदारे
                     दीपमाळा सजविल्या
आनंदाच्या प्रकाशात
होई दिवाळी साजरी
मुले बाळे नटलेली
गोड दिसती गोजरी
             लाडू ,चिवडा, चकली
             अनारसे जाळीदार
              झाल्या दंग गृहिणी
              बनविण्या चवदार
सुवासिक उटण्याचा
गंध सारा फैलावत
स्नाने अभ्यंग चालती
फटाक्याच्या आवाजात
           लक्ष्मी पूजन सोहळा
          दारी सजल्या रांगोळ्या
          लाह्या बत्तासे प्रसाद
          शोभिवंत भुईनळ्या
प्रतिपदा दिन असे
साडेतीन मुहुर्ताचा
शेवटचा भाऊबीज
बंधु प्रेमाच्या नात्याचा
                अशी असे दिपावली
                सर्व सणांची ही राणी
               " शुभ दिवाळी "सर्वांना
                  हीच प्रभो  विनवणी.
                                                   

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

बालपण

                                              बालपण
बालपण काल नातीच्या शाळेत कॉन्सर्ट होता .त्यामुळे त्या कॉन्सर्ट प्रोग्रामा ला गेले होते. लहान मुले छानच परफॉरम करत होती. मुलांपेक्षा त्यांचे पालकच फार उत्साहात होते ..मुले पालकांकडे पहात परफॉर्म करत होती तर मधेच इकडे तिकडे पहात हाताने एॕकशन आणि नजर कुठे तरी भिर भिरती होती . कोरिओग्राफर बिचारी मनापासून मुलांच्या कडे तोंड करून, त्यांना कसे करावयाचे ते दाखवीत होती . फार मजा वाटत होती तो सर्व प्रकार पाहून. छाया चित्रणे घेण्यात पालक दंग होते . केवढे ते फोटो , किती वेळा ,..so sweet ,.. so cute वगैरे शब्द कानावर येत होते . मी त्या निरागस बालकांकडे पाहता पाहता मला माझी बालपणातील मुले दिसू लागली . योगायोग असा की ज्या बालमंदिरात मी जात होते त्याच बालमंदिरात माझी मुले पण शिकली होती . त्यामुळे विचारांच्या तंद्रीत मी गुंतत गेले . दोरीचे रीळ उलगडावे तसे काळाचे रीळ उलगडत गेले . मी मुलांच्या काळातून ,आपल्या स्वतःच्या काळात मी मला विचारांच्या तंद्रीत पाहू लागले. त्यावेळचा, त्या काळातला वार्षिक उत्सव अंधुकसा आठवणीत आला. हो ! बरे आठविले. बालमंदिरावरून .... .त्या बालमंदिरात जाताना, मी जेवढा त्रास दिला होता ना त्या काळात आई बाबांना ! तेवढा माझ्या मुलांनी पण ,मला ...त्रास दिला नव्हता . मी एकतर फार आजी वेडी होते . आणि आजी पण नेमकी जून महिन्यात तिच्या भावाकडे गेल्याने सुरुवातीस मी बालमंदिरात जाण्यास फार कटकट केली होती. अजूनही मला ती स्मरते , आठवते ... आणि आई पण सर्विसला शाळेत जावयाची ..तर मी बस स्टॅन्ड पर्यंत तिच्या मागे पळत जायची . मला पकडून पकडून आणावयाचे . पण आजी आली व मग माझी गाडी रुळावर आली . नाहीतर नुसता खाऊचा डबा खाऊन घरी जायचे म्हणायची . पुढे शाळेतील तिसरी वा चौथीतील गोष्ट असावी . माझी शाळा घराच्या अगदी जवळ होती. जसे बालमंदिर जवळ होते . त्यामुळे सोडायला व घ्यायला येणे भानगड नव्हती . शाळा प्रायमरी म्युनिसिपाल्टीची व हायस्कूल फक्त महाराष्ट्र शिक्षण मंडळ चे . सर्व मराठी लोकांसाठी एकमेव एकच होते .. प्रायमरी शाळा मावळंकरांच्या जुन्या वाड्यात भरायची . एक ते सातवी पर्यंतचे वर्ग चालायचे . मुनिसिपाल्टीच्या प्रायमरी शाळा बऱ्याच आहेत . बऱ्याच एरिया प्रमाणे , आमच्या शाळे च्या बाजूला छोटी दुकाने जेथे गोळ्या , पेपरमिंट , बोरे , विलायती चिंचा घेऊन बाई बसायची . मुली तिच्या कडून विकत घ्यायच्या . माझ्या बाल मनास पण विकत घेण्याचे मन झाले . आई बाबा आमच्या घरी पैसे कधीच कडी कुलूपात ठेवत नव्हते . स्वयंपाक खोलीत एक भिंतींतले कपाट होते .त्यात एका पातेल्यात पैसे ठेवले असायचे . एकतर आजी घरात असायची व घरात दुसरे कोणी येणारे जाणारे नसायचेच. . तेव्हा मी सहज त्या पातेलीतून आजीला न सांगता २ पैसे तर कधी ३ पैसे घेत गेले. व कधी गोळी तर कधी काही विकत घेतले . एक दोनदा तर आजीला पण आणून दिले . तिने विचारले ,"अग तुझ्या जवळ कुठून आली गोळी तर चक्क मैत्रिणींनी दिली असे खोटे सांगितले. असे ३/४ वेळा केले असावे .. तरी आजी म्हणायची अग शाळा सुरु होताच तुझ्या मैत्रिणी बरे विकत घेतात, तर मी चक्क म्हणाली , " हो ना . ,कारण त्या लांबून येतात ना .... ".. . पण एकदा वर्गात ,मराठी विषयात गुरुजी म्हणी शिकवत होते . त्यात एक म्हण शिकवण्यात आली ".झाकली मूठ सव्वालाखाची " गुरुजींनी त्यावेळी काय अर्थ शिकविला तितका लक्षात नाही . पण, माझ्या मनाने मला समजविला शिकविलेला ,अथवा मनाने घेतलेला अर्थ असा की जो पर्यंत चोरी उघडकीस येत नाही तोवर ठीक आहे . आपण पैसे न विचारता घेतले आता अशी चूक करता कामा नाही . आणि त्या दिवसा नंतर मी कधीच न सांगता पैसे घेतले नाहीत. खरच शिकवण , शिक्षण कसे माणसास घडवते हे त्या म्हणींचे ज्वलंत उदाहरण आहे. पुढे प्रायमरीत असतांना ची गोष्ट . दूरच्या मैत्रीणी शाळा सुरु होण्या अगोदर त्यांच्या बस च्या सवलतीने availability प्रमाणे यावयाच्या . माझे तर घर शाळे जवळ , त्यामुळे अगदी शाळा सुरु होण्याच्या वेळेवर मी जावयाची. दूरच्या मुली शाळेच्या आवारात ,वाड्याच्या बाहेर बसल्या असायच्या . त्यातील एका मैत्रिणीचे वडील शाळेच्या जवळ असलेल्या बँकेत सर्विस ला होते , ती नेहमी रिसेस मध्ये पाणी पिण्यास त्यांच्या बँकेत जावयाची. व ती कशी जाते ,तेव्हा दारांत शिपाई ( त्या काळात माहीत नव्हते त्याला सिक्युरीटी गार्ड म्हणतात ) कसा उभा असतो , बँकेत कसा थंडावा असतो ,मी बाबांकडे गेल्यावर कसे चपराशी पाणी आणून देतो. वगैरे खूप खूप वर्णन करून सांगायची . व मला विचारायची यावयाचे आहे का बँकेत पाणी पिण्यास.? पण त्या पाणी पिण्याच्या मोबदल्यात तुला माझा गृहकाम बाकी असेल तर करून द्यावा लागेल. मी किती तरी वेळा त्या बँकेत पाणी पिण्याच्या लालसेने तिचा गृहकाम करून दिला होता . तेव्हा कोठे माहित होते. पुढे ३१ वर्ष त्याच बँकेत पाणी पिणार होते पण तो केलेला गृहकाम मात्र छानच फळला म्हणायचा . असे बालपण कधी अभ्यासासाठी बोलणी खाण्यात ... .कारण swimming ने अभ्यास कमी व्हायचा तर आई बाबांवर चिडून बोलायची . काय पोहण्यात पारितोषिके मिळविते तर तिला डोक्यावर चढवली आहे . अभ्यासाकडे ती लक्ष देत नाही.... आणि असेही मुली बाबांच्या लाडक्या असतातच. ना ! माझ्या बाबतीत तेच व्हायचे. असे "बालपण " आंबट गोड आठवणीत कधी सरले कळलेच नाही . उगाचच का म्हणतात, "बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा". ....... ..... वैशाली वर्तक (अहमदाबाद)

दिवाळी कालची व आजची

दिवाळी कालची व आजची

दिवाळी तीच आहे अजुनी
येते जी कार्तिक मासात
पण बदलय रूप तियेचे
सध्याच्या गतिशील जीवनात

लागता दिपावलीची चाहूल
घरदारे निघती उजळून
आता मात्र ,घर असते सदाच
जणू , हाॕटेल सम सजवून.

विचार येता दिवाळीचा
फराळ बनवण्याची गडबड
आजच्या दिवाळीत मात्र
आऊटींगला जाण्याचे आयोजन

पूर्वी दिवाळीतच होई खरेदी
आता आॕन लाईन सदाच चाले
असता घरात रास वस्तू कपड्यांची
दिवाळीला खरेदीचे महत्व नुरले

आधी फटाके असायचे कमी
व्हायची भावंडात तयांची वाटणी
आता फटाके असती भरपूर
तर फटाक्याला बंदी , अन् वेळच कमी.
.............वैशाली वर्तक.

गणेश स्तुती

गणेश स्तुती  
                                8/9/2018
गजानना गणराया
तुला प्रथम मोरया
मान तुझाच सर्वदा
आधी तुलाच वंदुया
            शुभंकर तू सर्वांचा
            बाप्पा वाटे आपुला
            तूचीअसे सुखकर्ता
            किती नांवे रे तुजला
तूच असे दुःखहर्ता
ठेव कृपा दृष्टी सदा
हीच विनंती तुजला
नको करु कष्टी कदा
             सर्व व्यापी असे तूची
             तूची असे लंबोदर
              महाकाय बुध्दीमान
              जन वदती ओंकार
चौदा विद्या अवगत
तव महिमा अपार
अधिपती स्वामी तूच
कुणी म्हणती मंदार
                 अल्प मती आम्ही जन
                 काय वर्णू तव गुण
                 श्रध्दा ठेवूनी मनांत
                 आले तुजला शरण.
                             वैशाली वर्तक ......8/9/2018

कधी कधी वाटे !

कधी कधी
कधी कधी वाटे l फुकाचा पसारा l
जन्म मरणाच्या l येरझारा ll 1
नको पुनरपि l जनन मरण l
व्हावे तत्व जल l कधीकधी ll 2
नदी देते जल l धावत वाहत l
जीवन देण्यास l प्राणीमात्रा ll 3
करिते संपन्न l धरेला समृद्ध l
पूजती म्हणून l मातेसम. ll 4
कधी वाहे संथ l कधी खळाळत l
मार्ग आक्रमित l अविरत ll 5
श्रम मोबदला l देई कृषीवला l
अर्पीते जीवना l सागराला ll 6
रवी किरणांनी l मेघांच्या रूपानी l
प्रवेशिते नभी l बरसण्या ll 7
कधी कधी वाटे lअसावा फुगारा l
सदा येरझारा l सर्वकाळ ll 8
........... वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...