मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

मन पाखरू पाखरू \घायाळ मन/मन माझे / मन( अष्टाक्षरी /मनाशी संवाद मनस्थिती मनस्थिती


 
                                                          मन पाखरू पाखरू
       स्नेहा नुकत्याच झालेल्या स्वत:च्या साखरपुड्याच्या समारंभाचा कोम्पुटर   वर लोड केलेला अल्बमचा  स्लाईड शों पहात होती.आणि बाजूला मराठी गाणी लावली होती .
                                       मी  मनांत हसता प्रीत हसे
                                        हे गुपित कुणाला सांगू कसे ?
गाणे वाजत होते गाणे. गुणगुणत मनाशीच हसत , पुन्हा  पुन्हा  दोघांचे फोटो न्याहाळीत होती. लग्नात कुठल्या प्रकारच्या,कोणत्या रंगाच्या साड्या  घ्यायच्या ,पैठणी कोणत्या  रंगाची घ्यायची, हेअर स्टाईल कशी करावयाची ब्युटी  पार्लरची  अपोईटमेंट कधी ,किती दिवस अगोदर घ्यायची ? हनीमूनला जाताना कोणते कपडे  न्यायचे ? वगैरे विचार करत होती .मनाचे पाखरू इकडून तिकडे बागडत अनेक विचार करत होते .मन  पाखरू थेट लग्न  समारंभा पर्यंत जाऊन पोहचले होते. खरच आहे . असेच असते .मनच  ते.त्याला पाखरू काय उगाच म्हणतात ? पाखरू जसे या फुलावरून त्या फुलावर स्वच्छदाने उडत भरकटत असते.तसेच मन पण या विषयावरून त्या विषयावर उड्या मारत असते. म्हणून तर त्याला चंचल असे म्हटले जाते  ,
        महाभारतात  यक्षाने  युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न होता.जगात सर्वात गतिमान काय ? तर युधिष्टीराने  क्षणात उत्तर दिले " मन " , मनासारखे  गतिमान काहीच नाही . क्षणात बसल्या जागी  पृथ्वी  प्रदक्षिणा करून येणारे,तिन्ही लोकात , तिन्ही जगात इतकेच नव्हे तर तिन्ही काळात फिरून येणारे मनच असते .गत जन्माच्या स्मृतीतून गेल्या जन्मात फिरून येते.
       जुन्या आठवणीत मन भूतकाळात जाते. जुन्या वस्तू हाताळताना, फोटो पहाताना मन सहजतेने भूतकाळाशी समरस  एकरूप होते. विचारांनी ,कल्पनांनी ,स्वन्पातून मन भविष्य ,भूत ,वर्तमानात सहजतेने विहरते,बागडते,भरकटते भरारी घेते .
        देवाने माणसाला डोक्यात मेंदू व शरीरात मन बहाल करून खूपच कृपा केली आहे.त्या मनाचा तो राजा असतो. दोन  अक्षरी साधा सुधा वाटणारा शब्द "मन " त्याला किती पैलू आहेत. राग ,लोभ ,द्वेष,भय,  आनंद ,दु:ख मद,मोह मत्सर इत्यादी. या पैलू  मुळेच मनाला भावना प्राप्त होतात .हेच मन माणसाला मस्त मजेत  जगावयाला  शिकवते.हे मन सुंदर ,सुद्दृढ , निर्मल असे असते. त्यासाठी त्यावर चांगली  जडण घडण करावी लागते ..
     लहानपणात मन निरागस असते.त्याला लोभ ,दु;ख ,काळजी , किंव्हा भय वगैरे पैलू  पडलेले नसतात .पुढे जवाबदारी मुळे, मोठे झाल्याने, विशिष्ठ संस्कार धडवून  वा  करून त्या  मनाची जडण  घडण होते. चांगले- वाईट,आपले-दुस-यांचे ,तुझे-माझे,वगैरे भावना स्पर्शतात .मग मनाचा कठोरपणा  वाढतो. दुजाभाव,मोह,स्पर्धा  इर्षा स्वार्थ वगैरे पैलू दिसू लागतात . हेच मन पाखरू , भरकटणारे मन या व्यावहारिक जीवनात रागाने ,द्वेषाने,इर्षेने, स्वार्थाने बसल्याजागी इतरांचा हेवा करते .वाईट चिंतते वा  इच्छ्ते .म्हणूनच इंग्लिश  मध्ये म्हण
आहे ना , empty  mind  is devil work shop                        
    हेच  मन पाखरू  प्रियजनांची काळजी,चिंता करत असतांना कटू प्रसंगी नको नको ते चिंतते.अगदी शत्रू
पण विचार करणार नाही असे वाईट विचार करत रहाते.म्हणून त्या मन पाखरा साठी "मन चिंती ते वैरी पण न चिंती "म्हण रूढ झालेली आहे .तर कधी हे मन पाखरू शेख  चील्लीतल्या गोष्ट्यी सारखे विचारांच्या ढगात गुरफटत भरकटत जाते . "मी हे करीन, मी ते करीन,मग असे होईल, मला असे वा अमुक करता येईल, मला असे काही मिळवता येईल,.मी अमुक करून दाखवीन.' असे विचार करत, विचारांच्या ढगातले मन, काचेचे  भांडे खळकन फुटावे तसे विचारांचे ढग हवेत कोलमडतात .आणि म्हणतात ना  जसे,
"मनातले मांडे मनातच रहातात "
.       यौवनात स्वप्नाळू पणे भविष्याची स्वप्ने हेच मन पाखरू रंगविते. मनानी अनेक प्रवास करते  अथवा केलेली प्रवास ठिकाणे गप्पा गोष्टीतून  पुन्हा फिरून येते .नवीन घर  बांधते ,सजवते ,त्यात मन विसावते सुखावते . आकाशात सूर्योदयी व  सुर्यास्ती जसे रंग बदलतात त्या प्रमाणे मन पाखरूचे रंग क्षणोक्षणी बदलत  असतात .
        स्वप्न म्हणजे पण काय ? दिवस भरात वा  कधी काळी केलेल्या विचारांचे मनाचे खेळ .म्हणून म्हणतात्त  'मनी वसे ते स्वप्नी दिसे ' मनातील विचार अंधुकपणे स्वप्नात दिसतात .
       रामदास  स्वामींनी या  मनास जिंका, त्यावर  काबू  मिळवा याबद्दल "मनाचे  श्लोक" लिहून मनास कसे वळण लावावे .हे उत्तम रित्या सांगितले आहे ..जो मन जिंकतो तो जग  जिंकतो .हे काही खोटे नाही .पण हे मन पाखरू फार चंचल असल्याने त्यावर ताबा मिळविणे फार कठीण आहे. संत लोकांचे वेगळे आहे त्यांचे तृप्त मन जगाला आनंद देण्यासाठी आहे." आर्ट ऑफ लीविग" अथवा योगशिबिरातून पण आज काल थोडा  फार मनावर  ताबा काबु मिळवण्याचे प्रयत्न  आपण करतो .
      यश ,वैभव आनंद ,प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात .पण आपणास हे प्रयत्न करण्यास आपले मनच  उद्युक्त करत असते .यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जिद्द हवी असते. धैर्य हवे असते .आत्मविश्वास हवा असतो. आणि हे सारे आपल्या मनातच असते.  आपल्याला जे हवे असते ते मनच आपल्याला देऊ शकते. मन आपल्याकडे खूप  काही सतत मागत असते, पण या  मनाकडे  आपणही खूप काही मागू शकतो .म्हणून हे मनच प्रसन्न झाले तर आपण हवे ते मिळवू शकतो. म्हणूनच म्हणतात ," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन " तेव्हा या भरकटणा-या  मनास प्रसन्न करणे आवश्यक आहे .मन प्रसन्न तर सर्व काही प्राप्त होते .
    
  

अभाशम ठाणे जिल्ला समूह 1
उपक्रम 
विषय - घायाळ मन

मन असते कोमल
दुखावते  ते सहज
विचारांती बोलावे
समजून बोलणे गरज

शस्त्र  करीती इजा
होते  उपाये ती बरी
पण शब्द करी घायाल
औषध काम न करी

फुलापरी  असे मन
सदा तयास  जपावे
दुःखद वार्ता कानी
सैरावैरा मन धावे

पहाता भीषण प्रसंग
मन होतसे  उदास
काही वेळा साठी
वाटे मनास भकास


मन करु नये घायाल
 त्रास होतसे जीवास
स्मरताची  ईश्वरास
शांति मिळे मनास


वैशाली वर्तक 






कवी संजीव प्रतिष्ठान
आयोजित 
कवी संजीव काव्य लेखन स्पर्धा2022
विषय - मन माझे  मन माझे

 * संतृप्त मन*


मन   माझे कोमल
दुखावते ते सहज
विचारांती मी बोलते
समजून बोलणे गरज

  मन  अल्लड बालपणी
होता  मातीचाच गोळा
मायबापांच्या  संस्कार कृपे
 आज आनंदाचा सोहळा

होता कळीचे फूल माझे
मन धावे सुसाट वा-यापरी
 भूईवर तर क्षणात नभी
आवरू न शके आजवरी

मन झाले शब्दांचे पाखरु
धावे लेखणीतूनी क्षणा क्षणा
नाना रसातूनी न्हाऊन ते
आनंद देते जना मना


पहाता  भीषण प्रसंग
मन  माझे होतसे  उदास
काही वेळा  साठी तर
भासे मनास भकास


अनुभवे जाता काळ
 मन संतोषी आनंदले
प्रसन्नता लाभे जीवा
 हर्षे मन विसावले

वैशाली वर्तक 
अहमदाबाद  (  गुजरात)








अधीर मन*


ध्यानी मनी स्मरे तुज
तुझ्या  नामाचे रटण
 राहो तुझे रुप चित्ती 
सदा करिते स्मरण


मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
आसावला जीव वेडा
गाते तव गुणगान    


तुझ्या नामाचा गजर
चाले सदा   क्षणो क्षणी
   आसावला जीव वेडा
  आस दर्शनाची मनी


माते तव दर्शनाला
मन माझे आतुरले 
कधी पाहीन तुजला
मन माझे अधीरले


 
मन माझे आनंदेल
प्रसन्नता लाभे जीवा
तव रूप पाहुनिया  
आसावल्या वेडा जी

 आस लागली अंतरी
आले आता मी शरण
आसावला जीव वेडा
दाखवावे तव चरण

वैशाली वर्तक 

अहमदाबाद





  ओळ काव्य -मज राहवले नाही


   शीर्षक - *ओढ*


भेट आपुली  पहिली

 *मज  नाही राहवले*

माझ्या  विचलित मना   

तूची   मज सावरले           1



पहिल्याच भेटीतला

वाटे अश्वासक   स्पर्श 

 दिले अनामिक सुख

देतो मना सदा हर्ष            2


छंद तुला  बघण्याचा

कसे आवरु मनाला

तुझाओझरता स्पर्श 

वेड लावितो जीवाला        3 


गंध तुझ्याच  प्रीतीचा

सदा   रहातो अंतरी 

रोज वसंत फुलेल       

 विश्वासाने ऊर भरी           4


सख्या येता सांजवेळ

उजळती आठवणी

मज नाही रहावले

प्रीत गंध स्मरे  मनी          5                             



LMD 37


आधीर मन

मन माझे  झालेअधीर
सदैव तुला भेटण्यास
कधी येशील जवळी
सांग माझ्या  मनास

   मनास छंद तुज पहाण्याचा
कसे आवरु  मम मनाला
तुझाओझरता स्पर्श 
वेड लावितो जीवाला 

तव रूप पाहुनिया  
मन माझे आनंदेल
प्रसन्नता लाभे जीवा
हर्षे मन विसावले

81414







अ भा ठाणे जिल्हा समूह 1
आयोजित उपक्रम क्रमांक
4/4/23
विषय. मनाशी संवाद 

मनाशी  साधवा संवाद
जातो त्यात वेळ जरा
मिळता निवांतात वेळ
मनःशांती साठी  उपाय बरा. 

उघडावे अनुभवाचे गाठोडे
गतकालीन चुका सांगे मन
मिळे प्रेरणा सुधारण्या
उज्वल भविष्य दावी क्षण

संवाद मनाशी  साधता
मन रंगवे   स्वप्ने सप्तरंगी
करण्या पूर्तता विचार मालिका
सहज तरारते  अंतरंगी

 जसे स्वरूप दावी दर्पण
   साधिता मनाशी संवाद
 अंतर्मन होई निर्मळ
 नुरे मग वाद विवाद.

वैशाली वर्तक
अहमदाबाद
 





      कल्याण  डोंबिवली महानगरसमूह 2 आयोजित  उपक्रम
5/7/22
विषय - मन माझे फुलपाखरु

       झाले मन पाखरु

मन  असतेच पाखरु
जसे फुलपाखरु चंचल
क्षणा क्षणाला भिरभिरे
 मनही असते चपळ

पाहूनी फुल-पाखरास
मन माझे  आले फिरुनी
गतकाळातूनी वर्तमानी
काळ सरला नजरेतूनी

घर बसल्या  मन फिरले
उगा का वदताती जन
न  आवरे आवरिता
त्याच स्थितीत होते मम मन

मिळाला थोडा विरंगुळा
मनाने  केले मनोरंजन
हेच तर  त्याचे  असे लक्षण
आनंदात जाती काही क्षण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



          अ भारतीय मसाप ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम
विषय.. मनस्थिती मनस्थिती 

जशी घडते घटना 
मन होई विचलित
नाचे मन आनंदाने
मन विभोर  होते  खचित

 येता प्रसंग तो बाका
मनस्थिती भयभीत
काही सुचेना क्षणभर
काय करावे अवचित

सुख दुःखाचा जीवनी
चाले  सदोदित खेळ
पण ठेवता मन शांत
साधावा लागतो मेळ

 रामादासांचे  मनाचे श्लोक
 अशा वेळी येती कामी
मनस्थिती शांत राखण्या
पठण श्लोकांचे युक्ती नामी

वैशाली वर्तक
अहमदाबाद



मराठी साहित्य  मंडळ गुजरात प्रदेश  आयोजित  काव्य लेखन स्पर्धासाठी
विषय -- **मन हे फुलपाखरु*



मन कधीच न असे दृश्य
तरी मन दावी तयाचे महत्त्व
जन म्हणती ते वसे हृदयात
  कर्मातूनी दिसे त्याचे अस्तित्व .

मन असे बुध्दी च्या कह्यात
तना करवी, काम होई क्षणात
 येता विचार , मन धावे सैरावैरा
नसे कोणी तयासम गतीशील जगात.


पाखरु असे मन सदा चंचल
फिरुन येती जरी बसता घरी
भिरभिरे फुला वरुनी त्या फूली
 येई फिरुनी क्षणार्धात  जगभरी.

मन ठेवावे सदा निर्मल
न जडावे तयास  मनो-विकार
काम क्रोध मोह माया लोभ पासूनी
दूर रहाण्या, करावा सद् विचार

मन ठेवावे  सदा काळ प्रसन्न
मिळते तयातच समाधान
सर्व  ईच्छा वसती मनातच
तेचि सर्व  सिध्दीचे   साधन

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात



मनस्पर्शी समूह वर काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी 
########################
संतृप्त मन मन ऊडुऊडू झाले 
#####################



मन   माझे कोमल
दुखावते ते सहज
विचारांती मी बोलते
समजून बोलणे गरज


  मन  अल्लड बालपणी
होता  मातीचाच गोळा
मायबापांच्या  संस्कार कृपे
 आज आनंदाचा सोहळा


होता कळीचे फूल माझे
मन धावे सुसाट वा-यापरी
 भूईवर तर क्षणात नभी
आवरू न शके आजवरी


मन झाले शब्दांचे पाखरु
धावे लेखणीतूनी क्षणा क्षणा
नाना रसातूनी न्हाऊन ते
आनंद देते जना मना


पहाता  भीषण प्रसंग
मन  माझे होतसे  उदास
काही वेळा  साठी तर
भासे मनास भकास


दिले कौटुंबिक  सुख देवाने
मार्गी लागली मुले जीवनी
कर्तृत्वाने नाव उजळले त्यांनी
समाधान लाभले  मनोमनी


दिले देवाने सुदृढ शरीर
अजून काय हवे मनाला
मन उडू उडू झालं
यश मिळाले मोद जीवाला




वैशाली वर्तक 

अहमदाबाद  (  गुजरात)

आनंदी मन
_----------------- 
 शीर्षक.   .मन उडु उडु झाले 
 _______'___:


किती साधे कारण ते

 ऊडु ऊडु झाल मन

ठरविलेली कामे झाली

आनंदाने उजळले क्षण


होते असे कधीतरी

मिळते  मना समाधान

होता खूष मन त्याक्षणी

वाटे देवाने दिले वरदान


 दिले कौटुंबिक  सुख देवाने

मार्गी लागली मुले जीवनी

कर्तृत्वाने नाव उजळले त्यांनी

समाधान लाभले  मनोमनी


दिले देवाने सुदृढ शरीर

अजून काय हवे मनाला

मन उडू उडू झालं

यश मिळाले मोद जीवाला






बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

bhel

                                                                 भेळ    
     भगिनी समाजाच्या आनंद मेळ्यास गेलो होतो.बरेच खाद्य पदार्थांची छोटी दुकाने लावलेली होती.
 .पण"मुंबई भेळ " या दुकानावर गर्दी अमाप होती .भेळेचाच स्टोल,गर्दी असणारच. भेळ म्हटली की
 पोटभर जेवल्यावर पण  एखादी भेळेची डीश शेअर  करावयास हरकत नसते.कारण भेळ पदार्थच
 अतिशयरुचकर ना ! तोंडाला नुसती चवच नाही पण भूक पण चाळवणारा पदार्थ .खरेच चुरमुरे कुरमुरे
 त्यातवाफवून कुसकरलेले बटाटे, बारीक चिरलेला  टोमेटो  ,मैद्याच्या पुरीचे चुरलेले तुकडे ,मीठ ,फरसाण, त्यात चिंचेच्या आंबट गोड  चटणीने , मिरची कोथिंबीर पुदिन्याच्या हिरव्या तिखट
 चटणीच्या  पाण्याने  सर्व पदार्थाचे नीट  मिश्रण करून वर बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव,  बारीक चिरलेली कोथिंबीर व त्यात लाल चुटूक अनारचे (डाळिंबाचे) दाणे,काय शोभिवंत  दिसते ना भेळ ! नुसते वर्णन ऐकूनच तोंडास पाणी सुटले ना ?
     भेळ म्हणजे तरी काय ? मिश्रण.निवडक खाद्य पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण म्हणजे भेळ.
तसे पहिले तर   स्वयंपाक कृतीत अनेक पदार्थांचे मिश्रणच असते .व त्या योग्य मिश्रणाने पदार्थ तयार होतो. सर्वच खाद्य पदार्थ,पदार्थांचे मिश्रण करून म्हणा अथवा भेळ करून म्हणा तयार होतात .त्याच खाद्य पदार्थास अनेक मसाल्याच्या  पदार्थांची भेळ करून  म्हणजे लवंग, तमालपत्र ,दालचिनी वगैरे मसाल्यांचे  एकत्रीकरण  करून वा मसाल्याच्या जिन्नसांची  भेळ करून खाद्य पदार्थांची रसना ,चव वाढविण्याचे काम , ही  मसाल्याच्या जिन्नसांची भेळच  करते.
     एवढेच काय भौतिक शास्त्रात पहा, धातूंच्या मिश्रणाने म्हणजे, दोन अथवा अधिक धातुंचे एकत्रीकरण  करून, भेळ करून वा मिश्रणातून धातू बनवितात .ज्या धातू वाहतुकीची साधनात, औधोगिक क्षेत्रात यंत्रातून  अनेक ठिकाणी वापरण्यात येतात.
     रसायन शास्त्रात  तर निव्वळ अनेक घटकांची भेळ अथवा मिश्रण आहे .आणि त्या मिश्रणातूनच रासायनिक पदार्थ तयार होतात .साबण ,औषधे ,कॉस्मेटिक्स ,खते , पेस्ट , मंजन वगैरे यात, तसेच रंगांत पण रंग, तेल व इतर प्रवाही घटकांचे मिश्रणाने रंग बनतात .तसेच प्रवाही घटकांचे मिश्रण करून, भेळ करून योग्य मिश्रणाने रासायनिक प्रवाही पदार्थ पण बनतात .
 .  रसायनातील नैसर्गिक प्रवाही पदार्थ पाणी.ते पण हायड्रोजन व ऑकसीजनचे  मिश्रणच आहे ना !
त्याच प्रमाणे वायूंचे विघटन केले तर कळते त्यात पण दोन अथवा अधिक घटकांची भेळ-मिश्रण
आहेच
    तसेच कापड उद्योगात पण ६०/४०अथवा ६०/३० .असे सुती व सिंथेटिक धाग्यांचे मिश्रण असतेच
 ना ?व  जेव्हां  असे मिश्रण नसते तेव्हां १००%सुती अथवा १००% रेशीम असे लेबल लावतात .
    सूर्य प्रकाशाचे किरण पावसाच्या थेंबातून जेव्हां प्रसार होते. त्या प्रकाशाचे पृथक्करण होऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते .म्हणजे सूर्यप्रकाश पण सप्तरंगाचे मिश्रणच आहे .आपले शरीर पण पंच महाभूतांचे योग्य प्रमाणात मिश्रणच होऊन बनलेले आहे .
     इतकेच नव्हे  तर कुठलीही  भाषा म्हणजे काय ? शब्दांचा योग्य समूह .त्यात शब्दांचे योग्य मिश्रण करून जोड शब्द तयार होतात .हे जोडशब्द म्हणजे शब्दांचे मिश्रण.व ते भाषेचा दर्जा वाढवितात.भाषेच्या व्याकरणात भर करतात .भाषेला समृद्ध करतात. जसे पंचपाळे,त्रिमूर्ती , नवरात्री वगैरे शब्दांनी भाषेच्या व्याकरणात समास तयार करतात .तसेच अनेक शब्दांना एक शब्द देऊन जसे गजानन ज्याचे मुख गजाचे आहे असा , कमलनयन ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा ,अथवा  मीनाक्षी जिचे डोळे माशाच्या आकाराचे आहेत अशी,असे जोड शब्द वा दोन  शब्दांची भेळ  -मिश्रण करून भाषेचा कस वाढतो .
     इतकेच नव्हे तर आपल्या भारतात सर्व जातीचे अनेक  धर्माचे , वेगवेगळ्या भाषा बोलणारे  लोक राहतात .सर्व जाती धर्माचे  लोक गुण्या गोविंदाने राहतात.  ती पण  एक उत्तम भेळच आहे .
      तेव्हा काय भेळ ही सर्वत्र  आहेच. पण भेळ शब्दात भे आणि ळ यात मध्ये स अक्षर नसावे  नाहीतर
भेसळ  शब्द तयार होतो .आणि ती योग्य नाही .जसे बांधकामात रेती, सिमेंटचे योग्य प्रमाण ठेवले नाही तर बांधकाम कच्चे होते .सोनाराने सोन्याचे दागिने बनवितांना तांबे जास्त मिसळले तर सोन्याचा कस  कमी होतो.खाद्य पदार्थात टीप कागदचा क्रीम म्हणून तसेच  लाकडाचा भुसा वा इतर वस्तूंचा व्यापारी लोक खाद्य पदार्थात वापर करतात. ती भेळ नव्हे  ती भेसळ आहे . व तसे करणे अयोग्य आहे . सध्या आपण पाहतो नको त्या व  तसेच शरीरास अपायकारक  अश्या वस्तू खाद्य पदार्थात राजरोस  वापरतात व त्यामुळे आता अश्या खाद्य पदार्थान वर बंदी  आणली आहे . कारण ती अयोग्य आहे हानिकारक आहे
      तर सर्वच क्षेत्रात भेळ आहे. पण भेसळ  नसावी .ज्या त्या क्षेत्रात भेळ करतांना सर्वांनी थोडी
नितीमत्तेची, उत्पादकांनी  गुणवत्तेची चाड ठेवली तर सर्व क्षेत्रात सुखद ,सात्विक, चवदार, सकस,कसदार पोषक वस्तूंची  तसेच पदार्थांच्या उत्पादनांची उत्तम भेळ अनुभवता येईल .

 

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

पसारा लेख

                                                              पसारा                                       
   मी कामानिमित्य बाहेर गेले होते. बाहेरून आले.घरात पाऊल टाकले पहावे तर घर म्हणजे इतस्थतः पसरलेले.ज्याला जी गोष्ट वाटली ती घेऊन पुन्हा    जागी न ठेवता तिथेच  टाकलेली .पहावे तिथे पसरलेला  पसारा .वाटलेपुन्हा घराबाहेरच जावे.घरात जाऊच नये .म्हणजे  दृष्टी आड सृष्टी .तो पसरलेलापसारा पहाण  नको व पसारा आवरणे नको .
 पण छे! बाहेर तरी किती वेळ रहाणार? एक तास ,दोन तास .मग घरी येऊन तरी पसारा पहाणे व आवरणे आलेच ना? आणि आपल्या शिवाय कोण आवरणार ? 
  म्हणतात ना ,मेल्या  शिवाय स्वर्ग दिसत नाही मरण आलेच म्हणजे ओघाने आवरणे आलेच, तेव्हा मी मुलांना हांका मारीत आत आले ."अरे मुलांनो, तुम्ही केलेला तुमचा रोजचा पसारा आवरा." त्यावेळी आजी मात्र
हंसत हंसत गाणे गुणगुणत होती.मला मात्र तिच्या गाण्याचा त्रास वाटत होता .त्या पसा-यांनी मला त्रास
होतोय ,डोके फिरतंय कोठून आवरू सुचत  नाही आहे आणि, ही मात्र  मजेत गुणगुणत आहे
                   अरे हा खेळ दुनियेचा
                  पसारा मांडिला सारा
       माझी  तोंडाने  बडबड  चालूच होती ." कुठल्या ही खोलीत जावे जिकडे तिकडे पसरलेले .रोजचे  रोज किती ही आवरा तरी तेच पसरून ठेवलेले .पसारा आवरणे काही संपत नाही .मुलांच्या खोलीत जावे व  पहावे तर त्यांनी  त्यांच्या खोलीत पुस्तके ,कपडे खेळणी जे हवे ते घेऊन बाकी इकडे तिकडे पसरून ठेवलेले असते त्यांचा सारा आवरून हॉल मध्ये यावे तर सकाळचे पेपर वाचून झाल्यावर  वर्तमान प्रत्येकाने  पानन पान वेगळे करून वाचल्याने तेथे वर्तमान पेपरचा पसारा. सकाळी चहा नास्त्याच्या  डायनिंग टेबलावर कपबशा, नास्त्याच्या डिशेस, त्याच बरोबर इतर वस्तूंचा पसारा असतो".
 तेव्हा थोडक्यात काय सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत पसारा करणे व पसारा आवरणे चालूच असते.व जीवन जो पर्यंत आहे   तो  पर्यंत पसारा  आवरणे हे असेच चालणारच .एवढेच नव्हे तर  जन्मापासून मरणापर्यंत पसारा करणे , तो वाढविणे आवरणे हे पण चालूच रहाणार.
    तर  ह्या माझ्याच विचारांनी मला आजी गुणगुणत असलेल्या गाण्याचा खरा अर्थ कळला .ती जे गाणे गुणगुणत होती  ते गाणेच मला सांगू लागले, की खरा पसारा तर ह्या विश्वकर्माने करून ठेवला आहे. एवढ्या मोठ्या या दुनियेची, जगाची निर्मिती केली आहे. व त्याच्या पसार-या  समोर आपला पसारा काहीच नाही. त्याने काय? काय? पसारा करून ठेवला आहे ,याची त्याला पण भ्रांत नसेल. हे जग व जगाचे  रहाटगाडगे, रोजचे नियमित दिनचक्र चालविणे, रोजचे नवनवीन सृष्टीत बदल घडविणे, जुन्याचा नाश करणे, काही ठिकाणी झीज करणे तर काही ठिकाणी  वृद्धी करणे हे त्या   विश्वकर्माचे  चालूच असते.  त्याचा  पसारा व त्याच्या पसा-याचा व्याप फार मोठा आहे.
      मनुष्य जन्माला येतो तेव्हा काही न  घेता येतो पण देवाने मानवास मेंदू बहाल केल्याने हळूहळू तो जसा
मोठा होतो तसा त्याच्या बुद्धीचा विकास होतो, त्यामुळे सुरवातीस आई, वडील, बहिण, भाऊ या जवळीक
नातेवाईकांच्या  पसा-यात गुरफटतो .पुढे त्याचा  कौटुंबिक गोतावळ्याचा पसारा वाढतो.पुढे वस्तूंचा भौतिक गोष्टींचा पसारा तो वाढवित जातो .प्रथम एक घर, एखादी गाडी करता करता जमीन, घरे ,गाडया या भौतिकसुखात अडकून सुखसोयींचा पसारा वाढवितो .मग ह्या पसा-यातून बाहेर निघणे ,तो पसारा आवरणे दिवसेन दिवस कठीण जाते . त्याचा पसारा तो वाढतच जातो.
     त्या विश्वकर्माच्या पसा-यात पण त्या विश्वकर्माने  केवढी जीव सृष्टी तयार करून पसारा मांडीला आहे.
 जल, चर .स्थळ सृष्टीचा समावेश आहे.आणि ही सर्व सृष्टी एकमेकास पूरक आधारित आहेत .त्याने  केलेल्या ह्या  पसा-या शिवाय एकमेकांचे जीवन शक्य नाही. या सर्व सृष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. त्याचा हा निसर्गसृष्टीचा पसारा सर्वाना आनंददायी असतो. 
  पण आपण मानवाने स्वत:केलेला पसारा आवरणे थोडे फार तरी शक्य आहे .भौतिक सुखाच्या पसा-यातून मन तृप्त करणे ,मन भरून घेणे , व त्यातून बाहेर निघणे हे जमते व  जमू शकते . जसं खूप उपभोगल्यावर मन तृप्त होवू शकते .पण मानवाला त्याने   मानसिक पसारा जो मांडीला आहे त्यातून मन काढणे अथवा तो पसारा आवरणे फार कठीण आहे . माझे सखे सोबती,माझा गोतावळा ह्या  सर्व पसारा-यातून मन काढणे कठीण आहे . तो पसारा आवरण्यासाठी अध्यात्माचीच जोड लागते ,गरज भासते . संताना महापुरुषांनाच जमते.  बाकी सर्व सामान्यास त्या मानसिक  पसा-याचा मन:स्ताप होतो . 
   खरेच  पसारा जीवनाचा मुख्य घटक आहे. पण एखाद दिवस घर फारच नीटनेटके आवरले असेल व स्वच्छ घरात आपण एकट्याच असलो तरी घर अंगावर येते ना ?.कारण घरात माणसे, पसारा, आणि त्या पाठोपाठ घराला येणारा जिवंतपणा हा  तर आपल्याला हवा हवासा  असतो. ह्या विचाराने मी सर्व घर नीट केले व आजीचे  गाणे मीच गुणगुणू  लागले .
                                                                                              वैशाली वर्तक








सोमवार, २० जून, २०११

maze sahjivan \\ वाट चाल प्रेमाची

                                                              सहजीवन
                डिसेंबर महिना होता. मी शेवटची उरली सुरलेली आकस्मित रजा casual leave  घेण्याच्या मूड मध्ये होते. सुट्टी घेतली तरी रजेचा मूड न येऊ देता सर्व कामे ऑफिसच्या   वेळेवर  आटपून  बरेच दिवसानंतर वा महिन्यानंतर सकाळचा " कामगार सभेचा" कार्यक्रम लावून मी जवळच  पडलेले   मासिक     चाळत होते. ध्वनिमुद्रीकांचा कार्यक्रम चालला होता.ध्वनिमुद्रिका चालू होती ,
                     दिसते मजला सुख चित्र नवे
                    मी संसार माझा रेखिते .
                मी गाणे ऐकता ऐकता २५  वर्षापूर्वीच्या
काळात ओढले गेले दोरीचे रीळ उलगडावे
त्याप्रमाणे काळाचे रीळ विचारांच्या तंद्रीत उलगडले गेलेव ८ जुलै साखरपुड्याचा दिवस
आठवला .त्या अगोदरएकमेकांनी "जीवनसाथी" म्हणून पसंत करण्यासाठीची पहिली भेट आठविली . लगेच
साखरपुड्याच्या दिवशी सासूबाई आणि नणंद यांचे
साखरपुड्याला जमलेल्या त्यांच्या  (आता माझ्या) नातेवाईकांसमोर कौतुकाने सांगत असलेले "
 आमच्या घरातअगदी शोभणारी आहे हो !दोघांची जोडी अगदी साजेशी आहे . आणि हो ! खेळाडू आहे. इंडिया रीप्रेझेंट केले आहे बर कां ! सुवर्णपदके मिळवली आहेत हो ! "असे शब्द
 कानांत घुमले. मग साखरपुडा ते लग्न अवधी म्हणजे जवाबदारी नाही. नुसते तयार होणे ,खरेदी करणे,
हिंडणे ,फिरणे, हॉटेलिंग करणे .नोकरीला जाणे व तासान तास उद्याची स्वप्ने रंगवित कधी बागेत बसून
गवत खुरडत ,तर कधी रेतीत उगीचच रेघोट्या मारीत बसणे. साखरपुडा ते लग्न म्हणजे सुवर्णकाळ ,
तो पण डोळ्या समोर  सरलेला आठवला.
            नंतर ठरल्याप्रमाणे सुमुहुर्तावर दोन कुळांचे मिलन झाले. एका घरची लेक दुस-या घराची मोठी
 स्नुषा म्हणून मी घरात प्रवेशकेला.  नोकरी निमित्याने आमचा संसार वेगळ्या गांवी करावा
 लागला त्यामुळे घरात राजाराणीचेच राज्य होते. स्वत:च्या मनासारखा संसार लावतांना लहानपणीचा भातुकलीचा संसार आठविला व मग प्रत्यक्ष
 संसार लावतांना आलेल्या अडचणी आठवल्या . एक-
 एक करत पूर्ण संसार सुख वस्तूंनी भरला गेला.तो संसार लावतांना दोघांनी एकमेकांना दिलेली साथ, कधी कधी केलेली काटकसर, कधी उगीचच धरलेले स्त्री हट्ट
( आता ते  हट्ट उगीचच धरले वाटतात  पण तेव्हाचे जिद्दीचे हट्टीपणाचे दिवस) मग  त्या हट्टापायी झालेला रुसवा, फुगवा  कधी कधी वाद- विवादआणि
 मग रडणे.पण त्यावेळी सुखी संसाराची भटजींनी
 लग्नमंडपात सांगितलेली व  रुखवतात  तयार   करून
 मांडलेली खसप्तपदितली संयम, सहनशीलता,
 तडजोड वगैरे पावले कधी कधी माझ्याकडून तर कधी यांच्याकडून अपोआपच अनुसरली गेलेली पावले आठविली ..
                अशी सप्तपदी नंतर  , पुढे संसाराची  वाटचाल करतांना संसार वेलीवर पहिले पुष्प उमलले .मग त्या प्रथम पुष्पास गोंजारण्यात, त्याचे कोडकौतुक लाड करण्यात दोघांचे जीवन कसे रसमय झाले .त्याचे लाड करण्यात व त्याच बरोबर त्यास उत्तम संस्कार देण्यात दोन्ही कडील आजी आजोबा मागे पडत नव्हते.कारण सर्वांचे ते मन रिझवणारे पहिले वहिले खेळणे होते. असे असतांना सहजीवनाच्या वेलीवर दुसरे  पुष्प पण उमलले . मग त्या दोघांकडे लक्ष देण्यात नोकरी करून,घर सांभाळून,आले गेल्याचे पहाण्यात, पाहुणचार  संभाळण्यात तर कधी सामाजिक तसेच कौटुंबिक प्रसंगात भाग घेवून संसार करतांना परस्परांकडे जाणता अजाणता लक्ष देवू न शकल्याने (हो  सध्याचे धावपळीचे  जीवन ना!) एकमेकांत  झालेली शाब्दिक वाद चर्चा मग
एकमेकांचे  चढते आवाज, व शेवटी कधी कधी अं sssह,  कधी कधी कसले ? नेहमी " पदरी पडलं  पवित्र झालं " असे म्हणत देखील पूर्ण केलेली भांडणे
आठविली .हो खरच,आहे .मला नाही वाटत भांड्याला
भांड न लागता संसार होत असेल कारण कोठेही
 दोन व्यक्ति एकत्र  आल्या की विचारांचे मतभेद होणारच .तेव्हा  कधी कधी "अगदी कंटाळले या संसाराला ! कुठून लग्न केले व या व्यापात गुरफुटले. त्यापेक्षा आधीचे आयुष्य किती स्वच्छंदाचे होते ! कोणासही   मला काय त्रास पडतोय त्याकडे लक्ष देण्यास वेळच नाहीय. साधे दोन गोड कौतुकाचे
 शब्द जाऊ  द्या.त्याची तर  अपेक्षाच  करु  नये .
फक्त  नुसते  दोष  दाखविणे." असे म्हणत अश्रू काढीत झोपी गेलेल्या रात्री आठविल्या .पण सकाळी पहावे तर यांनी स्वतः  उठून चहाचे आधण ठेवून दिलेली प्रेमाची हांक ऐकली कीं, रात्रीचे सर्व  विसरून पुन्हा पूर्ववत सकाळच्या  कामात व्यस्त  होऊन,  दोघांनी  ऑफिसला जातांना हंसतमुखाने निरोप घेतलेली ती सकाळ
पण डोळ्या समोरून सरली .    
               संसारात स्त्रिला तिची मुलगी काही  नंतर  मैत्रिणी समान वाटते .स्त्री स्वतःचे  बालपण त्या मुलीच्या बालपणात पहात असते .तिचे लाड ,तिची हौसमौज   करण्यात ,  तिला  तयार  करण्यात,  नटविण्यात  सजविण्यात, स्त्री स्वत:ला पहात असते. आपली उरली सुरलेली हौस, तिची हौस  पुरविण्यात स्त्रिला  समाधान  लाभत  असते .व  शेवटी कन्यादानाचे  पुण्य मिळते  ते वेगळेच .  तेव्हां  मला  पण   कन्या रत्न लाभले असल्याने ते पुण्य पण  माझ्या पदरी आहे  अशा विचाराने मी हर्षित झाले.      
             आता हा संसार पूर्ण वटलेला आहे . पण खर पाहिले तर, आता नव्या नात्याची पदवी मिळण्याचे दिवस जवळ आले आहेत . कालची बागडणारी मुले आज सुजाण झाली आहेत . त्यांना देखिल त्यांचे विचार ,मत प्राप्त झाली आहेत. तेव्हा त्यांचे पण विचार मत ऐकून पुढे तर येणा-या गृहलक्ष्मी ला घर सोपवून
 त्यांचे कौतुक करण्यात,मोठ्या मनाची तयारी करायला   हवी.  आत्तापर्यत संसारात   गुरफटल्याने    समाज ,समाजसंस्था ,समाजकार्य यांच्याशी  समरस व्हावयाला  जमले नाही तर आता   त्यात  समरस  व्हावयाला हवे .तसेच कधी आर्थिक  तर कधी कौटुंबिक जवाबदारीने हे सुंदर जग निहाळता
आले नाही  तर आता पर्यटन करावयास हवीत .
                 असे विचार डोक्यात असतांना विचाराच्या तंद्रीत असताना  दरवाज्यावर  बेल दोनदा-तीनदा  दाबल्याचा आवाज कानीं आला . व तंद्रीतून जागे झाले धावत जाऊन दार उघडले.  दारात  "हे "  उभे होते . हे म्हणाले ,"अग करतेयस तरी काय ? मी कधीचा बेल  वाजवितोय  झोपलेली  तर  दिसत  नाहीस.  मग काय दिवा  स्वप्न पहात होतीस की काय?  मी हंसत  म्हटले  मी ,ना !  आपल्या  झालेल्या  सहजीवनाचाआढावा घेत होते. इतक्यात ध्वनि-मुद्रिकेच्या  कार्यक्रमात आता  शेवटचे  गाणे ऐका  म्हणून ध्वनिमुद्रिका  वाजू लागली,    
               देवा दया तुझी ही की शुद्ध दैव लीला
              लागो न  दृष्ट माझी माझ्याच वैभवाला .
     खरच मला वाटले, माझ्याच संसाराला. .

                                      वैशाली वर्तक

                                   
    
 

रचियता समुह 
उपक्रम

विषय- वाटचचाल प्रेमाची

एकमेकास  घ्यावे समजून
वाटचाल करावी प्रेमाची
मने जुळता ,तडजोड करता
सदासाठी  ती असते आनंदाची

साधे शब्द, नको उद्वेग
नकोत कधी गैरसमज
त्वरित करावा उकेल
नसते वाद विवादाची गरज

समज मनी विचारांची 
जुळवून  घेणे काळाशी
या सा-याच गोष्टींची 
सांगड घालावी मनाशी

मग पहा कशी प्रेमळ 
जादुई  वाटे वाटचाल
सदा निर्मळ आनंदे
करा सर्वत्र  हालचाल 


वैशाली वर्तक 

सहज सुचच गेले  ते लिहीले








  







शनिवार, ११ जून, २०११

लेख.. V. अलिप्तता


                                                  अलिप्तता 
     मनुष्याच्या स्वभावाचे अथवा वृत्तीचे अनेक पैलू असतात .हसतमुख वा
  उदासीन  मुखदुर्लभ अबोल वा बडबड्या ,समाधानी वा असंतुष्ट ,धीर गंभीर वा 
खेळकर ,एककल्ली वा मोकळ्या स्वभावाचा तर कधी अलूफ अलिप्त प्रकृतीचा   
अशी माणसे आढळतात .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो 
त्यावर व ज्या माणसात वावरतो त्यावर पण थोडी फार अवलंबित असते .अथवा 
काही वृत्ती जन्मताच स्वभावात असतात .तर काही वृत्ती परिस्थितीने अंगीकारल्या 
जातात . आता अलिप्त वृत्तीवर बोलावयाचे म्हणजे ही वृत्ती थोडी फार अंगी असते अथवा 
वर म्हटल्या प्रमाणे परिस्थितीने स्वीकारावी लागते, अंगिकारली जाते .  
    परदेशात अगदी लहानपणापासून स्वतंत्र खोल्या असल्याने स्वतंत्र खोलीत 
रहाणे झोपणे याची मुलांना सवय होते .त्यामुळे पुढे पण  त्यांना आपल्या आपल्यातच  
रमणे रहाणे याची सवय लागते .भारतीय लोक परदेशात जातात, तेव्हा  त्यांना ही
अलिप्तता वृत्ती अंगीकारावी लागते .जवळ शेजारी कोण- कोण रहात आहे ? त्याच्याशी
 दोन-चार मिनिटे आपल्या अंगणातून दारातून वा बाल्कनीमधून गप्पा मारीत उभे आहेत 
असे आढळत नाही . अपार्टमेंट मध्ये सकाळी लिफ्ट मध्ये कोणी भेटले वा सामोरे
आले तर गुड मोर्न्निग ,थांक्यू स्वॉरी , हाव अ नाईस डे   या तीन चार शब्दांच्या पुढे काही 
नाही .एकत्र गाडीत सहप्रवासी एकमेकात सहप्रवाशान बरोबर गप्पा मारत आहेत असे आढळत 
नाही .आपापली पुस्तके ,वर्तमान पत्रे घेवून त्यात डोके खुपसून वाचणे .बस .त्या विरुद्ध परिस्थिती 
 आपल्या देशात दिसते . वर्तमान पत्र दुसर्याच्या  हातात असताना त्यातच डोके घालून वाचणे वा
पेपरातीलबातमी वरून चर्चा करणे ,एवढेच काय चहा अथवा नास्तापण शेअर करणे असा प्रकार
 सहजतेने  आढळतो. 
         परदेशात गेल्यावर भारतीय स्वत: वृतीने अलिप्त नसल्याने चार-पांच कुटुंबे एकत्र येऊन वीक
एंड एन्जोय करत असतात .कारण तेथील सुख वस्तूंनी भरलेले ,सर्वत्र हिरवळ असलेले
पण स्वतः:चे कुटुंब  सोडून दुसरे कोणीच नसल्याने  आठवड्यानी वा  पंधरादिवसांनी एकत्र कार्यक्रम करून जी अलिप्तता भासत असते ती दूर करण्याचा प्रयत्न करतात .    
       मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे .त्याला माणसे ,समाज लागतोच .वर्षानु वर्ष एकाच गांवात राहून 
" आम्ही कधी मंडळात,  समाजात   आलोच  नाहीत , आम्ही   मंडळाचे  सभासद नाही " असे म्हणणाऱ्या    लोकांबद्दल  आश्चर्य वाटते. कसे काय राहू शकत असतील ?  पण तसे नसते अशी मंडळी दुसरी कंपनी ,मित्र जमवून वा
,जोडून रहात असतात .तर  एकूणकाय अलिप्तपणाने रहाणे कोणासच आवडत नाही         
     सध्याच्या  धावपळीच्या युगात थोडे  फार अलिप्त रहाणे अंगीकारावे लागत आहे . वेळेचा अभाव  त्यामुळे 
आपल्या आपल्यातच  रहाणे स्विकारावे लागत आहे.काही व्यक्ती आपली मने लिखाण द्वारे  जरी चार माणसात
मिसळली नाहीत बोलली नाहीत तरी वर्तमान पत्र वा इतर लिखाण द्वारे इतरांशी संवाद साधतात.तसेच   आपल्या
 आवडी निवडी प्रमाणे पेन फ्रेंड्स बनविणे ही पण अलिप्तता दूर करण्याचा  एक प्रकारच   आहे   आपल्या  आवडी प्रमाणे मित्र शोधून थोडया  वेळा साठी  कां होईना  अलिप्तता  दूर करतात.      
      प्रौढत्वाकडे झुकल्यावर वाचनालये ,सोसायटीचे ,कॉमन प्लॉट  मधील बाकांवर ,बागेत जावून  वरिष्ठ
नागरिक त्यांची मंडळे काढून  अलिप्तपणा दूर करत असतात .कारण संसारात  मुले मोठी होवून    
 त्यांच्या त्यांच्या  संसारात रममाण असतात अशा  वेळी  वरिष्ठ नागरिक आपली समवयस्क 
मंडळी गोळा करून आपला अलिप्तपणा घालवीत असतात . अलिप्तपणा दूर करण्यासाठी सध्या  
दूरदर्शन ,कोम्पुटर  वा मोबाईल वर whatsapp वरून संभाषण ही माध्यमे तर फारच उप्यागी ठरत आहेत. ज्याच्या
साह्याने  माणूस दिवसाचा काही वेळ तरी एकाकी पणा दूर करू शकतो .
        संतांनी जरी सांगितले की,जीवन चिकूच्या बी सारखे असावे .अलिप्त .तरी सर्व सामान्य माणसाचे 
आयुष्य  आंब्याच्या कोयी  सारखे असते .कोय जशी आमरसात लडबडलेली असते ना! तसेच मनुष्याचे
 जीवन  संसारात लडबडलेले असते. संतांनाच तो अलिप्तपणा जमतो .पण सर्व सामान्य 
माणसांना नाही. तेव्हा  लेखन ,वाचन ,चित्रपट  पाहणे दूरदर्शन चे कार्यक्रम पहाणे ,कोम्पुटर च्या माध्यमाने
  अथवा आपल्या  हॉबिज जपून,,कला क्रीडा वगैरे च्या  साह्याने काही काळ तरी अलिप्तता 
दूर करू शकतो . बाकी  अलित्पपणा कोणासच पसंत नसतो .     

रविवार, २२ मे, २०११

killi

                                                                    
                                                                          किल्ली 
             काय वैताग आणलाय या किल्लीने ! सळो की पळो करुन सोडले.  एवढी छोटीशी वस्तू पण ,जर व्यवस्थित जागी ठेवली नाही की झाले.  खरच म्हणतात ना, गरजेच्या वेळी वस्तू व नोकर मिळाले तर स्वर्ग लाभल्याचा आनंद मिळतो.  पण छे कुठले काय ? इतके कुठले आपले भाग्य ? कुठे ठेवली गेली काय माहित नाही. सकाळी बँकेत जाताना कायनेटिकची किल्लीमिळालीनाही,त्यावेळीस डूप्लीकेट किल्लीचा वापर करुन बँकेत उशीर होत असल्याने वेळ  तरी निभावली.  बरे झाले ,ती  डूप्लीकेट किल्ली तरी  मिळाली.नंतर बँकेत पोहोचल्यावर टेबलाची किल्ली पर्स मध्ये असून दिसत नव्हती.  त्यामुळे तेथे  पण किल्लीने त्रास दिला.  संध्याकाळी घरी आल्यावर मंडळाच्या मिटींगला जावयाचे होते, पण मागच्या मिटिंगचे, मिनीट्स लिहावयाची डायरी ज्या कपाटात ठेवली होती,  त्या कपाटाची किल्ली मुलाने कोठे ठेवली, ती  न मिळाल्याने शेवटी मिनिट्स पुन्हा लिहून काढण्याचा खटाटोप करावा लागला. अशा रीतीने आज मीराची किल्ली या वस्तूने मानसिक स्थिती पार बिघडवली होती.आज जरा वैतागून च मीरा झोपली .
              मीराला झोप लागली.  थोड्याच वेळात काय गंमत ! दिवस भरात न मिळालेल्या किल्ल्या मीराला वाकुल्या दाखवित होत्या. व नाचत होत्या .त्यातील कपाटाची किल्ली तर म्हणत होती, काय ग , का वैतागता आमच्या  सारख्या निर्जीव वस्तूंवर ? आम्ही तर तुमच्या सुखसोयीसाठी आहोत.तुमच्या वस्तू,  तुमची घरे, वहाने यांच्या सुरक्षिते साठी आम्ही आहोत. स्वत: नीटव्यवस्थित तुम्हीच नियत केलेल्याजागी
आम्हांस  ठेवा बस. रहा  की मग  निर्धास्त होवून . आमच्यावर भरवसा ठेवून जगभर ,देशभर ,गांवभर हिंडता .कुलूप नीट  लावून दोन दोनदा ओढून खेचून बंद केले ना याची खात्री करता . पण मग निर्धास्त होवून आम्हास  पर्स मध्ये कपाटात वा इतर नियत जागी जपून ठेवा ना ! म्हणजे वैतागावे  लागणार नाही .
               आमची ऐटच आहे तशी.घराशी आल्या आल्या प्रवेशकरताना आमची प्रथमआठवण होते.घरात
शिरताच डाव्या अथवा उजव्या हाताला आमच्यासाठी आकर्षक घरे बनवून आमची जागा केलीअसते. बाहेर जाता तेव्हा   पर्स मध्ये वा खिशात अगदी हृदयाशी जपून ठेवता .आमची रूपे
अनेक पण काम मात्र एकच मानव जातीची सेवा करणे .तुमच्या वस्तूंचीनीट काळजी घेणे .त्यांची
सुरक्षितता राखणे .आम्ही  तुमच्या सेवेला विविध ठिकाणी हजर असतो .तुमच्या वहानांची सुरक्षितता जपतो .त्यामुळे तुम्ही धावपळीच्या जीवनात वेळेवर पोहचता .एवढेच काय घरातील कपाटे, बँकेच्या लोकरच्या किल्ल्या ,बाहेरगांवी जाताना सुटकेस ची  किल्ली,ऑफिसेसच्या किल्ल्या ,अश्या अनेक ठिकाणी आम्ही  तुमच्या सेवेला हजर असतो .
              नवीन लग्न झालेल्या मुल्लींना कपाटाच्या
किल्ल्या सासूबाईंनी सांभाळण्यास दिल्या आहेत हो! म्हणत चांदीच्या छल्ल्यात आम्हाला अडकवून, कंबरेस लावून मिरवतांना मनात आनंद वाटतो ,पण
जवाबदारी  पेलणे जमावे लागते .
           लहान मुलांना आनंद देण्याच्या ठिकाणी पण आम्ही आहोतच .किल्ली दिली की चालणारी खेळणी तेथेपण आमच्याच किल्ली बिरादरीतील
किल्लीच असते. जिच्या सहाय्याने खेळणी चालतात. गाड्या  धावतात, बाहुल्या नाचतात ,कुत्रे उड्या मारतात अश्या अनेक खेळण्यात आम्ही असतो पण त्या खेळण्याच्या किल्ल्या म्हणजेच आमचीच  बदलती रूपे आहेत  . हीं बदलती रूपे  तुम्ही  जपली नाहीत तर  ती  खेळणी निरुपयोगी होतात .आमचे काम एकच तुम्हाला आनंद देणे, तुमची सेवा करणे.
           हाशsहुश करत ऑफिस मध्ये जाऊन टेबलाजवळ येता व प्रथम आठवण होते ती आमचीच समोर आवासून पडलेले काम पाहून पर्समध्ये भिरकवलेली किल्ली नाही मिळाली की जीवाची तडफड करता .पण आधीच योग्य जागी ठेवाना !.
           आम्हीजाणतो सध्या धावपळीच्या युगात तुम्हा मानवावर कामाचा ,तसेच  जवाबदारीचा खूप ताण पडत आहे. दिवस भराच्या दगदगीत जीव थकतोय पण आम्ही  निर्जीव वस्तू करणार तरी काय?आम्हाला वाच्या नाही .वाचा असती तर ओरडून आम्ही कोठे आहोत.हे तुम्हास सांगितले असते. पणआम्हास तुम्ही  मानवांनी या विज्ञान युगात वाचा दिली आहे . त्यामुळे कधी कधी आम्ही  चमकून, प्रकाशित होऊन वा आवाजाने  आमचे वास्तव्य कोठे आहे ते दर्शवितो .
              आम्हासअडकविण्यासाठी कंपन्या ,बँका,
मेडीकॅल कंपन्या सर्व जण त्याच्या जाहिरातीसाठी
कीचेन काढतात त्यात आम्हास विराजमान करतात.
कुलूमहाशयांचे बरे असते एका जागी बसून
लटकून  रहातात. त्यांना आम्ही बंद करून स्थगित करून ठेवतो.त्यामुळे त्यांना शोधण्याचा फार त्रास नसतो.
            अरे हो ! कुलूप वरून आठवण झाली.  पुर्वी  रामराज्यात  म्हणे  चोऱ्या  होत  नव्हत्या.   त्यामुळे आमचे महत्व कमी होते. आज पण शानि शिंगणापूर  म्हणून गांव आहे. तेथे  म्हणे कोणीच  घरादारांना वाहनांना,  दुकानांना कुलुपे लावत नाहीत. तेथे   आमची उपस्थिती कमी जाणवते.
   फार  पुर्वी पासून भारतात  अलीगडला   आम्हांस  बनविण्याचे अनेक कारखाने  आहेत. तेथील कुलूप-किल्ल्या  जगभर प्रसिद्ध  आहेत. तसेच कित्येकांना कुलूप- किल्ल्यांचा संग्रह करण्याची पण आवड असते बरे का !  पुण्याला   केळकर  म्युझियम  मध्ये  तसेच  हैद्राबादच्या  सालारजंग म्युझियम  मध्ये आमचे विविध आकार,विविध रूपे अगदी जुन्या काळापासूनच्या
कुलूप - किल्ल्या  दिसतील.
                  आमच्यात  एक ताई किल्ली असते . जिला  मास्टर किल्ली  म्हणतात.आमच्यातील  कोणी  एक  उपस्थित नसेल तर ती सर्वांचे काम करते.  असो.  अर्थात आम्ही  निष्ठेने सेवा करतो पण आम्ही सज्जन माणसांसाठी आहोत. दुर्जन ज्यांची वृतीच खराब त्याच्या समोर आमचे काय चालणार ?  तेव्हां
 तशा वृत्तीची माणसे कुलुपावर अत्याचार करून आमच्या शिवाय तुमच्या सुरक्षितेत बाधा आणतात. त्याला आमचा नाईलाज असतो.
          कॉम्पुटर  युगात पण आमची भौतिक नाही पण सांकेतिक चिन्हांनी आमचे अस्तित्व आम्ही  ठेवले आहे. तेथे आमची आकार विरहित  शाब्दिक रूपे आहेत. साहित्यात पण आम्हाला सुविचारात
वापर करतातच की,"परिश्रम हीच यशाची गुरु किल्ली"आहे.
         आणि हो !एवढेच काय ! जीवनात सकारात्मक भावना अथवा विचार ठेवले की जीवनाकडे पाहण्याची वृत्ती बदलते .व यशस्वी आयुष्य जगता येते तेव्हा आयुष्याच्या  यशाची गुरु किल्ली कळली की सर्व कसे निर्मल ,आनंददायी वाटते .ही किल्ली ज्याला मिळाली तो सुखी होतो.तेव्हा आमच्या सर्व सामान्य नामी किल्ली या  शब्दात पण किती गूढ रहस्य आहे ना!
      तेव्हा मीरा उठ. उगाचच वैतागून झोपलीस.वेंधळ्यासारखी वागल्याने उगाच त्रागा केलास. नीट पहा मी जागच्या जागी व्यवस्थित आहे .

                                                                                                वैशाली वर्तक.(अहमदाबाद)









        

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...