बसलोय निवांतात
होते रोजची सकाळ
आटपण्याची नसे घाई
एकांत जीव खाई सदाकाळ.
ओसरीत पहुडणे
बाजेवर बसणे शांत
नाही बोलायला शेजारी
नाही उरली उद्या ची भ्रांत .
कसे असते एकाकी जीण
नाही सहन होत आता
पाखरे उडाली घेण्या भरारी
वेळ जात नाही जाताजाता.
खेळणी हाती घेऊन
पुन्हा पुन्हा हात फिरवितो
नातवंडांचा स्पर्श शोधता
जीव त्यात रमवितो.
एकटेच आलो एकटे जायचे
माहित आहे जरी मना
पण मन मात्र नाही अजून
समजत आलेल्या या क्षणा