शनिवार, ११ एप्रिल, २०२६

पाऊलखुणा

असतात उपयोगी जीवनी
पाऊलखुणा प्रत्येकास फार
तिच्या मुळे  लागतो ठाव
भुतकाळाचा  वारंवार 

 चालताना वाटसरू 
टाकत असतो पाऊल
मागच्या  वाटसरूला मिळे.
सहज दिशेची चाहुल.

उगा का म्हणती जन सदा
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
पाऊल खुणांना  अनुसरता
न उरतो  चुकण्याचा बहाणा

पाऊलखुणा रचती ईतिहास   
राखता संग्रही अनुभव
भविष्यकाळ होतो सुकर
आठवणीत घेत स्वानुभव 

पाऊलखुणा असती ठसे
 वर्तमानाचे मार्ग दर्शक 
सहज येती कामास 
 पथिकास दिशा सूचक

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

अष्टाक्षरी. वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम 1391

दि 3/2/26
विषय. वही 

आनंदिले मनोमनी
वही पाहून  सुंदर 
गुज मनीचे सांगण्या 
मन धावे क्षणभर 

किती सुबक बांधणी
वही खुणावी मनाला 
घेऊनिया लेखणीला
मन सुरु  लिखाणाला.

 रेखांकित ओळीवर
 झरताची शब्द फुले 
पाने वहीची फुलली
आनंदाने मन डुले.

निळ्या शाईची अक्षरे
जणु मोतीयाच्या माळा
 करी  शोभित पानांना
मोद होतसे मनाला

झरझर उलटली
लेखणीने खूप पाने
 मन माझे  शांत झाले
 पूर्ण लिहीता गाणे,

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ एप्रिल, २०२६

अक्षर रेषा करिती सुजाण

आला हाती कोरा कागद 
होतीच बाजूला  सखी लेखणी..
आले मनी विचार सहज 
उमटवली  अक्षरे  देखणी 

असतेच मैत्री दोघांत सदैव 
हृदयीचे भाव  कागद 
दावितो. खुलवून सदा
स्वतः च्या पटलावर अलगद

सखी लेखणी रेषांमधून
फुलवी अक्षरांचे मोती 
गुंफत जाते सुंदर माळ
वाचक वाचून सजाण होती

रेषांमधील मनीच्या भावना 
उमजता वाचकास
अक्षर शब्द वाक्ये बनून 
वाढे ज्ञानाचा हव्यास

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

पंख मिळाले शब्दांना

 काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 782
विषय ..पंख मिळाले शब्दांना 
शीर्षक..  मिळते उभारी लेखणीला 

 मनी  पिंगा घाली शब्द 
 मन गुंगे विचारात 
 माळ मनी विचारांची 
 साकारली लेखनात

 शब्द शब्दास जोडून 
 वाक्ये  अनेक गुंफली
कधी काव्यात गद्यात
शब्दे साहित्यी झरली. 

मन धावे सैरा वैरा
 मिळे गती विचारांना
अंतरात येता लाटा
पंख  फुटती शब्दांना

   खेळ चालतो शब्दांचा
  शब्द येतात धावून 
   यमकी अलंकारिक 
  उचित जागा पाहून 

पंख फुटता शब्दांना
 वेळ काळ प्रसंगात
सदा रमे सारस्वत 
शब्दांच्याची गाभाऱ्यात 


वैशाली वर्तक
 अहमदाबाद

बुधवार, १ एप्रिल, २०२६

मालिनी वृत्त

फक्त वृत्तबद्ध 
मालिनी वृत्त 

अक्षरे 15.  8अक्षरावर यती
 लललललल गागा. गालगागाल गागा

नमनकरित आली    कांक्षिणी  मंडपाशी
हळुहळु पद टाके ,   मोदवाटे उराशी                       

दिवस गणित होती ,आजच्या या क्षणाची
चपळपण मनाची, लाज वाटे जनांची

उपरति तिज ठायी, दाखवेना  कुणाला
 पण मन अविरामी,  गुंतले त्या  क्षणाला .
             
क्षणभर तिज आता,   कंठ दाटून आला.    
जिवलग जिव सारे, आठवे ती सुखाला

घडि घडि मन आता, राहवेना क्षणाने
सजल नयन ओले, आसवाने मनाने


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २६ मार्च, २०२६

चित्र काव्य


नसे चिंता उन पावसाची 
 मिळविण्या रोजची भाकरी
निघाली पहा ललना
नाही करित कोणाची चाकरी

नवीन घेऊनी भांडी
सांभाळीत डोईवर भार
तान्हास बांथून कडेवर
कष्ट करायला तयार

जुने घेऊनिया कपडे 
 मुखाने भांड्यांची आरोळी
देते नव नवी भांडी
वणवण फिरे घरांच्या ओळी .

 ताई माई ऐकता तिची हाक
   बोलावी तिजला त्वरित 
वाट बोहारणीची पाहून 
वस्तू विनीयम करित

असा रोजचा शिरस्ता 
 नाही वाटे कधीच शीण
रोज वेगवेगळ्या पेठेत 
 फिरता होत नाही क्षीण

शुक्रवार, २० मार्च, २०२६

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान

पिवळे पान ,पांढरे केस
असती दोन्हीही समान. एकसमान 
ऊन पावसाळे साहिलेले
जयांना मिळे सदा मान

  जैसे पर्णांचे  पिकणे
  नियमच असे सृष्टीचा
बाल्य ,तारुण्य , वृध्दत्व
हाची क्रम आयुष्याचा

किती सहजतेने पर्ण
येते गिरक्या घेत भूवरी
घेते विसावा खत म्हणूनी
पुन्हा  फुलवण्या धरेवरी

वृध्दांच्या जीवनातील
मिळालेले अनुभवाचे बोल
नव पीढिला ठरे मार्गदर्शक 
 जाणावे सदा त्याचे मोल

पिकल्या पानांनी पण
गाऊ नये सदा इतिहास
सद्य काळ तितकाच कौतुकाचा
 पहातआनंदे वाढवा त्यांचा उल्हास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

पाऊलखुणा

असतात उपयोगी जीवनी पाऊलखुणा प्रत्येकास फार तिच्या मुळे  लागतो ठाव भुतकाळाचा  वारंवार   चालताना वाटसरू  टाकत असतो पाऊल मागच्या  वाटसरूला मिळे...