रविवार, ९ जून, २०१९

जीवन एक संघर्ष

विषय--- जीवन एक संघर्ष

कोणास  वाटे जीवन तर,
  असे तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
तयाचा जमवावा लागे मेळ.

येई  कधी दुःखाला भरती,
तर कधी आनंदाची लाट.
नसे निरंतर  सदा तिमीरच,
तिमीरा नंतर प्रकाश वाट.

निसर्ग पण सहतो संघर्ष
चंद्र सूर्यास पण लागते  ग्रहण
सरिता आक्रमिते विकट वाट
अवनी करे सतत भ्रमण.

यश मिळविण्या कष्ट अपार
जन्माला येताच ,सुरु संघर्ष
स्वप्न पूर्ती , करण्या साकार
महेनतच करी जीवनी उत्कर्ष

दगडला पण,  मिळवण्या देवत्व
 सहतो , टाकीच्या घावांचा  संघर्ष
जीवन तर , आहेच  संग्राम
ध्यानी ठेवा हाच एक,  निष्कर्ष .

पहा आपले पंतप्रधानजी
लढले झेलीत अनेक संघर्ष
प्रेरणा देती  सर्व  जगाला
कसे जगावे, निष्काम सहर्ष.


वैशाली वर्तक ( अहमदाबाद )

पहिला पाऊस

     पाऊस पहिला
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा  दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ  अंबरात

नाचती हर्षे मुले अंगणी
टप टप धारा बरसता अवनी
मोर दावी  नृत्य मनोहर
झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी

पडता धारा अवनी भिजली
तृप्त झाली पाणी पिऊनी
टप टप पागोळ्या पडती दारी
गंध मातीचा दरवळे दिशातूनी

जो तो जाई क्षणात भारावूनी
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची  चवच आगळी.

पाऊस  पहिला राहे स्मरणात
जून्या आठवणींना आणतो पूर
  घडले  असूनी जरी गतकाळात
आठवांनी भरुन  येतो  ऊर

वैशाली वर्तक



अष्टपैलू काव्यमंच (महिला)
अष्टपैलू काव्यमंच कला अकादमी आयोजित 
उपक्रम 78
विषय - पहिला पाऊस 

      मजाच आगळी
      
काळ्या ढगांनी भरलेअंबर
उडे पाचोळा  दाही दिशात
वारा वाहे सोसायट्याने
गडगडती मेघ  अंबरात


जो तो जाई क्षणात भारावूनी
पहिल्या पावसाची मजाच वेगळी
वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी
कांदे भज्यांची  चवच आगळी

  सौ वैशाली  अविनाश वर्तक 
अहमदाबाद



 सिद्ध  साहित्यिक  समूह
उपक्रम  ४५२
- काव्य लेखन अष्टाक्षरी 
विषय - आषाढ सरी

   वर्षा ऋतू

मृग सरी बरसता     
झाली  धरा अंकुरित
तृणपाती चमकती
धरा दिसते हरित

पसरली हिरवळ
रंग धरेचा हिरवा
भासे पसरला पाचु
ऋतू  म्हणती बरवा

तृप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
 सरी आषाढाच्या येता
 पाणी पाणीच अंगणी

वाजवित ढोल ताशे 
मेघ राजा बरसला
नृत्य  दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला

पाणी साचे जागोजागी
नदी वाहते  बेफाम
वृक्षलता चिंब झाल्या
 नसे सरींना  आराम

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
 सिद्ध  साहित्यिक  समूह
आयोजित  उपक्रम
विषय - पाऊस
- *वर्षा धारा*

तप्त झाली वसुंधरा
मेघ गर्दी नभांगणी
आला सोसाट्याचा वारा
पाणी बरसे अंगणी

वाजवित ढोल ताशे 
मेघ राजा बरसला
नृत्य  दावी सौदामिनी
मोर आनंदे नाचला

चिंब झाली वसुंधरा
आल्या पावसाच्या धारा
ओल्या झाल्या वृक्षवेली
गाणी गात फिरे वारा

मुले नाचती आनंदे
गात गाणी पावसाची
टपटप झेली धारा
माळ दारी  पागोळ्याची

पावसाची सर येता              
मृदगंध   पसरला 
तृप्त जाहली अवनी
मोद भरूनी उरला


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ७ जून, २०१९

लग्न विवाह बंधन

स्पर्धेसाठी
विषय --लग्न -विवाह --गठबंधन     5/6/2019

सहजीवनाचे  रम्य  चित्र
पाहिले मी स्वप्नातूनी
अन् माझे न मी राहिले
तुला पाहता त्या क्षणी

शुभ घडी मुहुर्तावर
साजरा करुनी लग्न सोहळा
झाले मिलन दोन जीवांचे
जमवूनी सारा गोतावळा

अग्नी ब्राह्यणाच्या साक्षीने
घातले मंगळसुत्राचे बंधन
केले माझे तुझ्यात समर्पण
आनंद घेण्या सहजीवन

अनुसरता सप्तपदी पावले
फूलले रे क्षण  माझे जीवनी
फुले वसंत संसार वेलीवरी
आनंदे   मी रंगले  क्षणोक्षणी

वैशाली वर्तक

मानवाचे पावसास पत्र

विषयः--मानवाचे पावसास पत्र

श्रीमान वरुणराजे
  सविनय नमस्कार  विनंती विशेष.
   मी समस्त मानव जातीच्या वतीने तुजला विनंती विषयक पत्र  लिहीत आहे. कारण पण , तितकेच महत्त्वाचे  आहे. आजच जून महिन्यातची सुरुवात झाली.
सुर्याचा मृग नक्षत्रात याच महिन्यात  प्रवेश होतो. चातक पक्षी त्या मृग नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असतो. तसेच आम्ही पण तितक्याच आतुरतेने  तुझ्या आगमनाची वाट पहात आहोत . तरी वेळेवर  अवनीवर येण्याची कृपा  दृष्टी ठेवावी..
      सूर्याने  ग्रीष्म ऋतुत भयंकर  दाहक किरणांनी , सर्व  वातावरण  तप्त केले आहे. मानवाच्या अंगाची  लाही लाही होत आहे. घामाच्या धारा वहात आहेत. अती गर्मीने नकोसे झाले आहे. धरणी मातेचा कण कण तप्त झाला  आहे. तिची काया नुसती रूक्ष नव्हे तर, तिच्यातील जल तत्व कमी कमी होत आहे. त्यामुळे धरेला तडे पडले आहेत. तिची तडे पडलेली काया ....भेगाळलेली काया,  जणू काही  तहानलेल्या बाळासम तोंड उघडे ठेवून  तुझ्या  पावसाच्या थेंबाची वाट पहात आहे. तिची अशी दयाजनक स्थिती  की , कित्येक  ठिकाणी तिच्यात पाण्याचा  अंश पण राहिलेला  नाही  . लवलेश उरला नाही. अशी स्थिती झाली आहे..शिवारे नुसती उघडी माळराने झाली आहेत. ती पण तुझ्या  बरसण्याची ..चिंब पाण्यात भिजण्याची वाट पहात आहेत.
      कृषीवल आकाशाकडे डोळे लावून तूझी आतुरतेने..तुझ्या पर्जन्य धारेची  वाट पहात आहेत. मानवाला पंचतत्वाची गरज आहे. त्यातील एक तत्व.. म्हणजे जल . ते तू आहेस . म्हणून तर तुला जीवन असे पण म्हणतात....संबोधतात. आणि दुखःद स्थिती ही की , तुझीच कमतरता भासत आहे.
       अरे पावसा , पर्जन्या तुजवरच सारी सृष्टी अवलंबून आहे .जल चर सृष्टी तुझ्यानेच तर जीवीत आहे. पशु , प्राणी यांना नदी नाले ओढे सुकल्याने जंगलातून
बाहेर धाव जलाशया कडे घ्यावी लागत आहे.  गुरांना तुझ्या  दुर्लभतेने पुरेसे गवत चारा .वनस्पती मिळत नाही .व मृत्यु मुखी पडण्याची वेळ येत आहे. पक्षांना पण
पाण्यासाठी जलाशय शोधावी लागत आहेत. तरी , आम्ही मानव घरोघरी पाण्याची भांडी ठेवून त्यांची सोय करतच आहोत. तरी तुझ्या  सेवेची  तुझ्या  येण्याची अत्यंत गरज आहे.
          आम्हा   मानवांची तर काय कथा सांगू ? आरे , कित्येक  गावात तर नद्या  विहीरी आटल्या सुकल्या .पिण्याचे पाणी  पण, मिळत नाही आहे. बायका मुली
उन्हाच्या कळशा , घागरी घेऊन ,कोसो अंतर चालत जाऊन ... पाण्यासाठी वण वण फिरत आहेत. कित्येक  ठिकाणी 1200/1400 फूट खणून पण पाणी मिळत हाती  लागत नाही आहे.. कित्येक  ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टेंकर 2/3 दिवसांनी पाणी पुरवून पुरवून  देत आहे.
   तुझी किंमत मानवास कळली आहे. जेथे पाणी अगदी कमी मिळते त्या लोकांच्या 
डोळ्यात पाणी येत आहे. अन्न , वस्त्र , निवारा जरी मूलभूत गरजा , तरी  तुझ्या  शिवाय जीवन अशक्य ना रे !. तरी पुन्हा  पुन्हा  विनतेय. ...तू वेळेवर लवकर ये.
नुसते आकाशी काळे ढग एकत्र करून , आम्हाला बरसण्याची आस दाखवून
वरून अवनीची मजा पहात बसू नकोस .त्या मेघांना बरसण्यास सांग.
      कृषीवल  पहा ..त्याची शिवारे नांगरून , उन्हात काबाड कष्ट करुन , घाम गाळून , जमीन कसून तयार करतोय. पीका साठी बाजारातून बी बियाणे  कर्जाने   घेउन  शेतीची तयारी करत आहे. शिवारात बी टाकेल,  पण तू जर वेळेवर बरसला तर ....त्याची ही सारी महेनत ,पैसा उपजेल. तरी तू वेळेवर ये .जेणे करुन बिया अंकुरतील .व पोशिंद्याची महेनत फळेल.
        आम्ही मानवाने काय करावे .तूच सांग आता .आम्हाला वैज्ञानिक प्रगती मागे धावण्यात  तसेच .....अती लोभाने आम्ही केलेल्या चुका  आता उमजल्या आहेत. ...वनांचा रानांचा -हास करुन आम्ही सिमेंटची जंगले तयार केलीत .
पावसाचे पाणी जमिनीत न मुरु देता सिमेंट चे रस्ते  केले .वृक्ष  कापल्याने वृक्षांची मुळे जमिनीतून पाणी शोषून... .पानातून पुन्हा  बाष्प रुपाने तुला मदत रुप होतात .त्या क्रियेत झाडे कापल्याने आम्ही  मानवांनीच तुझ्या बाष्प साठवण्याच्या क्रियेत  व्यत्यय  आणला. पण आता चूक  उमजली आहे. तशी पावले पण आम्ही मानव उचलत आहोत .प्रवासात  जातांना चिकू ,आंबा ,पपई तसेच इतर बिया घेउन त्या  रस्त्यात टाकण्याची मोहिम पण सुरु केली आहे .जेणे करुन वृक्षाची लागवण होईल. वृक्ष वाढ होईल .व पुन्हा  ही वसुंधरा हिरवी होईल.
        तरी यावर्षी वेळेवर ये.  तुझी आम्ही सारे मानव आतुरतेने वाट पहात आहोत.
पुन्हा सर्वत्र  जलाशय पाण्याने भर. व सध्या जी बिकट परिस्थिती  झाली आहे ती दूर  कर नाहीतर काही वर्षा नंतर पाण्यावरुन   युध्द  होईल. .
  तरी मानवाच्या  ह्या विनंतीस  मान देऊन योग प्रमाणात  बरस. लहान मुले पण होड्या करुन .तुझ्या  पावासाच्या पाण्यात खेळण्याची वाट पहात आहेत. टपरी वाले गरम चहा व कांदे भजीच्या गाड्या सरसावून तयार आहेत. फक्त खोळंबा आहे तो तुझा.
   तुझ्यावर अवलंबित
        मानव जात.

शनिवार, १ जून, २०१९

कविता चित्र



चित्र  कविता                         13/5/2019
ठिपक्या ठिपक्यांच्या रांगोळी साठी 
काढतात रांगेत                             
समान अंतरावर  ठिपके               
अगदी व्यवस्थित
एका खाली एक
जराही न होऊ देता
तयांना इकडे तिकडे

पण, हे पहावे तर नवलच
ही तर  सारी पादत्राणे
ठेवली इतकी व्यवस्थित
जणू कवायतीला बसलेली शाळकरी मुले

तयात अजून आश्चर्य
सारीच पादत्राणे दिसती समान
कशी ओळखणार
कोणती आपली तयात?

पहा उतरल्या दोन महिला
अनवाणी पायांनी
शोधती तयांची  पादत्राणे
सर्वत्र नजर फिरवूनी

कशा  शोधू माझ्या  चप्पला
हा प्रश्न त्यांना ही पडे
क्षणभर वाटे कुठलीही अडकवावी
आणि व्हावे पुढे

हळूच ऐकू आला आवाज
असे विचार  असता मनात
लक्ष देऊन ऐकू लागता
 समजले , पादत्राणे वदले क्षणात


याsssया  लवकर तुम्ही
बसलो आहोत ताटकळत  उन्हात
आम्हास  नाही ना प्रवेश
आत देवालयात

आम्ही बसतो इथेच  पायरीशी
बसून   करितो मनात  मंथन
 वाट पहाण्यात दंग होऊनी
देवाचे मग्नतेने   चिंतन

तुमच्या  देव दर्शनाचे चरण
आम्हास जेसे स्पर्शता
मिळे आम्हा सदा
 देवदर्शनाची धन्यता

ऐकूनी विचार  पादत्राणांचे
माझे मन मलाच विचारी
काय काय विचार  केलेस मनात
मुक त्या पादत्राणा विषयी

किती उदात्त  विचार  तयांचे
कळले उमजले  माझे मजला
तोकडी पडे माझी च लेखणी
क्षणात  ध्यानात आले मला

बुधवार, २९ मे, २०१९

उतार वयातील सोबती

उतार वयातील सोबती
    उतार वयात खरोखरच सोबती हा अत्यंत  गरजेचा. एकतर निवृत्तीचा काळ... .त्यामुळे  वेळ भरपूर .आणि  वेळ भरपूर  म्हणजे... इथे तिथे नको तिथे  (तरुण लोकांच्या मते) लक्ष देण्यात मन सळसळत असते. आणि मग उगाचच
वाद वाढविणे. त्यात उतार वयात अनुभवाचे साठवण ऊतु जात असते . अनुभवाच्या बोलांचे साठवण भरपूर असल्याने आपली मते देण्यास  उगीचच मन सारखे स्फूरत असते .व आजकाल तर कोणासच  ... अगदी लहान मुलांना पण उपदेशाचे बोल ऐकण्यात रस नसतो वा आवडत नसते.
     "तुम्हाला काय प्रोब्लेम आहे" हा त्यांचा  उलट आपणास प्रश्न असतो. तेव्हा आपणास कोणी विचार नसता  आपण आपला " सोबती " शोधून त्यात रममाण रहाणे जास्त  उचीत ठरते.
        तसा तर प्रत्येकाला कसला न कसला छंद असतो. नसेल तर , उतार वयात आपण आपले परिक्षण करुन तो शोधावा .जेणे करून   तो आपला खरा सोबती ,सांगाती  बनू शकतो. तरूण वयात  काही इच्छा असून ...वेळे अभावी वा संसाराचे गाडे ओढता राहून वा दूर्लक्षित केल्या असतात तर त्या आता लक्षात घेऊन पूर्ण  करण्याचा छंद जीवास लावावा . जो सोबती म्हणून कामास येतो.
        सध्याच्या गतिशील युगात वैज्ञानिक युगात मोबाईल हा तर अगदी सखा सोबती आहे. पूर्वी  (हो आता पूर्वी च म्हणायची वेळ आली. ) जसे TV म्हणजे
इडियट बाॕक्स म्हणायचे ...पण तो रिटायर्ड मंडळीना करमणुकीचे छान साधन. अजून पण तसे  आहे च  नाही असे नाही. पण घरात अभ्यास करणारी नातवंडे असली की त्यांच्या अभ्यासात त्रास होतो.ती पण तिथेच येऊन बसतात .मग ऐकावे लागते .आणि आजी आजोबांना पण त्यांचा करमणूकीत व्यत्यय येतो.
       पण मोबाईल हा सोबती खरच छान .त्याची पूर्ण  माहिती  करुन शिकून घेतले पाहिजे. त्याच्या अनेक application असतात. त्याची माहिती करुन घेतल्याने तो आपणास हवी ती भजने , भक्तीची गाणी, वा हवे ते जुने नवे टि व्ही कार्यक्रम  आपल्या सवाडी प्रमाणे पहावयास हा सोबती  उत्तम कामास येतो.
        मी माझे स्वतःचा  अनुभव सांगते .आज या  मोबाईल सोबती मुळे  मी दिड/ पावणे दोन महिन्या पासून घरातच आहे .पायाला fracture झाले त्यामुळे डाव्या गुडघ्याचे आॕपरेशन झाले. अजून 20 दिवस तरी वाॕकरनेच चालायचे आहे .पण या मोबाईल" सोबतीने "मला जरा पण एकटे पण जाणवू दिले नाही. घरातील बाकीची मंडळी  त्यांचा त्यांच्या उद्योगास जातात  .पण हाती हा सोबती असल्याने,.. मी आम्ही साहित्यिक ,... शब्द अंतरीचे ,... मनस्पर्शी.. , यारिया साहित्य  ग्रूप, अशा अनेक समुहातील स्पर्धेत भाग घेण्यात  वाचण्यात  वेळ मस्त जातो.व गेला. एकही दिवस कंटाळा  वाटला नाही .त्यात काल पासून ह्या  नव्या समुहात अमृतवेल  मधे आले ,आज त्याच्याच  साहाय्याने  लेखणीस स्फूरण मिळून या सोबतीचे गुणगान गावयास संधी मिळाली.
         तेव्हा उतार वयात मोबाईल सोबतीची सकाळी उठून जसे ,
  "  कराग्रे वसते लक्ष्मी "श्लोक म्हणतो , तसे उठल्यावर लगेच हात सोबतीला शोधण्यात आतुर असतो.

वैशाली वर्तक (अहमदाबाद )

गुरुवार, २३ मे, २०१९

दुष्काळ ते सुगीचे दिवस

दुष्काळ ते सुगीचे दिन
चित्र अधारित  कात्य कविता

झळा ऊन्हाच्या सहूनी
धरा पहा भेगाळली 
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली    

वाट पाही बळीराजा
काळ्या  ढगांना पाहूनी
दृष्टी तयाची आकाशी
वरुणास विनवूनी

कष्ट करुनी उन्हात 
काळ्या मातीला कसून
नांगरली काळी माय
घाम तयात गाळून

पाणी पडले मृगाचे
बीजे पहा अंकुरली
आनंदला अन्नदाता
स्वप्ने मनी रंगवली

शेते दिसती हिरवी
किती सुरेख रेखीव
जणू रेखाटल्या कोणी 
ओळी हिरव्या आखीव

शोभिवंत भासे शेत
मोती जणू कणसात
वरुणाच्या कृपेनेच
सुख आले शिवारात

पीक  आले भरघोस
मोल मिळाले कष्टाचे
दिसे दारी धान्य रास
दिन दाविले सुगीचे

देवाजीने केली कृपा
स्वप्न सत्यात उतरले
राजा राणी पोरं बाळे  
घर सारे आनंदले.

 आनंदाने  गृहलक्ष्मी
 पाही तिच्या धन्याला
 धनी माझा राहो सुखी                                            
  करी विनंती देवाला

       ......वैशाली वर्तक.

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...